मुंबई महापालिकेसाठी भाजपकडून यापूर्वीच रणशिंग फुंकले आहे. आज मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या सत्कार कार्यक्रमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार प्रहार केला होता. यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही जोरदार पलटवार करत घणाघात केला आहे. फडणवीस यांनी बाळासाहेबांच्या नावाने मते मागणे म्हणजे मोदी पर्व संपत आल्याची कबूली दिल्याचा बोचरा पलटवार उद्धव ठाकरे यांनी केला. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत भाषण करताना आपल्याला बाळासाहेबांच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी मुंबई महानगर पालिकेत सत्ता मिळवायची आहे म्हणत बाळासाहेबांच्या नावाने मते मागायचा केविलवाणा प्रयत्न केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता मोदींच्या नावाने मते मागून उपयोग होणार नाही हेच एकप्रकारे अधोरेखित केले, मोदी पर्व संपल्याचीच ही नांदी आणि कबूली आहे.

अधिक वाचा  अयोध्येतील राम मंदिरांने सरकारचा खजिना भरला, अब्जावधीचा कर दिला, ट्रस्टचे महामंत्री चंपत राय यांची माहिती आकडा एकदा वाचा!

भाजपच्या धोरणानुसार वापर संपला की नवीन नाव शोधायचे आणि त्यांच्या नावाने मते मागायची आणि आपली सत्तेची तळी भरायची असाच हा प्रकार या निमित्ताने भाजपचा खरा चेहरा देवेंद्र यांनी समोर आणला. महाराष्ट्रातील जनता यांना मतपेटीतून याचे उत्तर देईल, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

फडणवीस यांच्याकडून उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत बोलताना म्हणाले की, तुम्ही सर्वांनी कालची मुंबई पाहिली का? तीच संस्कृती, तोच उत्साह, तोच जल्लोष, तीच परंपरा… पुन्हा एकदा आपलं सरकार आल्यानंतर काय घडतं, हे आपण सर्वांनी पाहिलं. दहीहंडी जोरात साजरी झाली. पुढील सणही जोरात साजरे करायचे आहेत. आताचे मुख्यमंत्रीही घरी बसणार नाहीत आणि तुम्हालाही घरी बसू देणार नाहीत, असे म्हणत त्यांनी ठाकरे यांना टोला लगावला होता.

अधिक वाचा  विधान परिषदेसाठी शहाजीबापूंचे एक पाऊल पुढे; फक्त यामुळं शहाजी बापूंना एकनाथ शिंदेंनी सकारात्मकता दाखविल्याचा शिष्टमंडळाचा दावा

मुंबई महापालिकेवर शिंदे गट-भाजप युतीचाच महापौर

गेल्यावेळी मोठी मजल मुंबई महापालिकेत आपण मारली. त्यावेळीही महापौर आपण बनवू शकलो असतो, आपली पूर्ण तयारी झाली होती. पण आपल्या मित्रपक्षासाठी आपण निर्णय घेतला आणि आपण दोन पावलं मागे गेलो. त्यांचा महापौर झाला. आता मुंबई महापालिकेवर शिवसेना (शिंदे गट) भाजप युतीचाच महापौर होईल, पण कोणती शिवसेना, तर माननीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारी शिंदेंच्या नेतृत्त्वातील खरी शिवसेना, असे फडणवीस म्हणाले.