2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे 23 खासदार जिंकून आले होते. त्यातील काही 2014 मध्येही निवडून आले होते, पण हॅटट्रिकची संधी असणाऱ्या काही खासदारांची तिकिटं कापली. महाराष्ट्रातील सात विद्यमान खासदारांना भाजपने उमेदवारी नाकारली असून, त्याबद्दलच्या कारणाची चर्चा जोरात सुरू आहे.
लोकसभा उमेदवारांची भाजपची पहिली यादी जाहीर झाली, त्यावेळी त्यात अनेक विद्यमान खासदारांची नावे नव्हती. त्यातून हे स्पष्ट झाला की, भाजपकडून अनेक ठिकाणी उमेदवार बदलले जाणार आणि झालेही तसेच. भाजपने 23 विद्ममान खासदारांपैकी 7 जणांचे तिकीट कापले.
मुंबईतील तिन्ही खासदारांना धक्का
2014 पासून उत्तर मुंबईचे लोकसभेत प्रतिनिधित्व करत असलेल्या गोपाल शेट्टी यांना यावेळी धक्का बसला. पक्षाने त्यांच्याऐवजी पीयूष गोयल यांना उमेदवारी दिली. त्यांच्याबद्दल पक्षातंर्गत नाराजी होती, अशी माहिती आहे.
ईशान्य मुंबई म्हणजे उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपने मनोज कोटक यांच्याऐवजी मिहीर कोटेचा यांना भाजपने यावेळी तिकीट दिले आहे. मिहीर कोटेच्या यांच्याविरोधात पक्षातील काहींची नाराजी आणि मतदारसंघात जनसंपर्क नसणे, ही तिकीट कापण्याची कारणे सांगितली जात आहेत.
प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन यांना हॅटट्रिक करण्याची संधी होती, पण पक्षाने संधीच न दिल्याने ती हिरावली गेली आहे. पूनम महाजन यांच्याऐवजी भाजपने प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे. 2014, 2019 मध्ये पूनम महाजन विजयी झाल्या होत्या. पण, यावेळी त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे.
कुठे कुठे बदलले उमेदवार?
मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रातील चार ठिकाणी भाजपने उमेदवार बदलले आहेत. यात सोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांना पुन्हा संधी देण्यात आलेली नाही. त्यांच्याऐवजी माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना भाजपने तिकीट दिले आहे.
बीड लोकसभा मतदारसंघाबद्दल उत्सुकता होती. अपेक्षेप्रमाणे पंकजा मुंडे यांना भाजपने निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. विधानसभेला धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकाच मतदारसंघातून लढले होते, तो पेच टाळण्यासाठी भाजपने ही खेळी केल्याचे सांगितले जाते. त्याचबरोबर माधव सूत्रावर भर देत प्रभाव असलेले ओबीसी नेतृत्व म्हणून उमेदवारी दिली गेल्याचे म्हटले जात आहे.
अकोला लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय धोत्रे यांची प्रकृती चांगली नाही. त्यामुळे भाजपने त्यांचे पुत्र अनुप धोत्रे यांना रिंगणात उतरवले आहे. त्याचबरोबर जळगावमध्येही भाजपने चेहरा बदलला आहे. जळगावचे खासदार उन्मेष पाटील यांनाही तिकीट नाकारण्यात आले. पाटील यांनी लगेच खासदारकीचा राजीनामा देऊन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.