हिवाळी अधिवेशनात काल वेगळ्या विदर्भाचा मुद्दा चांगलाच गाजला. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरून थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच घेरलं. वेगळा विदर्भ होत नाही, तोपर्यंत मी लग्नच करणार नाही, अशी भीष्म प्रतिज्ञा देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यांच्या या प्रतिज्ञेचं काय झालं? वेगळा विदर्भ झाला का? वेगळ्या विदर्भाचं काय झालं? शब्द दिला तर तो पाळायचा ना? असा प्रश्नांचा भडिमारच एकनाथ खडसे यांनी फडणवीस यांच्यावर करत कालचा दिवस गाजवला.

विधान परिषदेत एका चर्चेत सहभागी झाले असता एकनाथ खडसे यांनी हा हल्लाबोल केला. देवेंद्र फडणवीस पाच वर्ष राज्याचे मुख्यमंत्री होते. आता उपमुख्यमंत्री आहेत. ते विदर्भातील आहेत. मी त्यांचा सहकारी होतो. विदर्भ राज्य वेगळा व्हावा ही त्यांची आधीपासूनची भूमिका होती. जोपर्यंत विदर्भ राज्य वेगळं होत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही अशी भीष्म प्रतिज्ञा देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती.

अधिक वाचा  महायुतीमध्ये काहीतरी गडबड? महाराष्ट्रात एकीकडे मोदी मैदानात उतरले तरी महायुतीचा ‘या’ जागीचा खल सुरुच

आता लग्न झालं. मुलगी झाली. मुलगी मोठीही झाली. आनंदाने सुखाचा संसार आहे. त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. पण सरकार आणण्यासाठी विदर्भातील लोकांना फसवण्याचं आणि भ्रम निर्माण करण्याचं काम का केलं? शब्द पाळायचे असतात ना? असा सवाल एकनाथ खडसे यांनी केला. राज्य सरकारने जवळपास तीस हजार कोटीचं कर्ज चार महिन्यांपूर्वी ठाणे आणि मुंबईसाठी घेतलं. मुंबईचा खर्च 45 हजार कोटीचा आहे. फक्त मुंबईच विकासासाठी महत्त्वाचा आहे का? महत्त्वाचा आहे. पण फक्त मुंबई -ठाण्यासाठी 45 हजार कोटी खर्च करता तर विदर्भासाठी किती खर्च करत आहात ते सांगा.

अधिक वाचा  विशाल पाटलांना तिकीट न मिळण्याच्या खेळीतील खलनायक जयंत पाटील; ‘या’ बड्या नेत्याचा गंभीर आरोप

विदर्भातील अनुशेष दूर करण्यासाठी तुम्ही काय तरतूद केली का? अर्थ मंत्र्यांनी सांगावं. हा असमतोल चार महिन्यात वाढला असं म्हणणार नाही. येणारी सर्व सरकारे त्याला जबाबदार असतील. अर्थमंत्री म्हणून तुमच्या जबाबदाऱ्या नाहीत का? वित्तीय शिस्त का पाळत नाही? राज्याची वित्तीय तूट वाढत आहे. फिस्कल डेफिशियट वाढत आहे, असंही खडसे म्हणाले. यावेळी कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्दयावरून त्यांनी फडणवीस यांना घेरलं. राज्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या रात्री बदली होतात. दुसऱ्या दिवशी बदली होती. कारण काय? बदल्यांची यादी जाहीर होण्याच्या आधीच दुसऱ्या दिवशी बदल्यांवर स्थगिती येते. राज्यभरात नियंत्रण का राहत नाही? पलोीस यंत्रणेवर अस्थिरता. राजकारणाच्या दबावा खाली कधीही बदली होऊ शकेल ही भावना त्यांच्यात आहे, असा दावा त्यांनी केला.

अधिक वाचा  अमित शहांची या शेअर्समध्ये 1कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक संपत्तीमध्ये ६३ टक्क्यांची वाढ; सविस्तर जाणून घ्या

राज्यात कायदा सुवस्थेचा बोजवारा वाढला आहे. मागील चार महिन्यात सामूहिक अत्याचार वाढला आहे. उद्या माझे काय होईल? त्यापेक्षा ऐकलेले बरं. यामुळे पोलीस गुन्हे दाखल करायला धजावत नाहीत. गुन्हा नोंद करण्यासाठी मला रात्रभर ठिय्या मांडावा लागला. कोर्टात गेलो तेव्हा कोर्टाने सांगितले तरी देखील गुन्हा दाखल झाला नाही. कोणाच्या आदेशाने हे सुरू आहे? कोणत्या महाशक्तीचा पोलिसांवर दबाव आहे? असा सवाल त्यांनी केला.