मुंबई: सुशांतसिंह राजपूत प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. पवारांनी आज ट्वीट करून केंद्र सरकारकडून काही अपेक्षा व्यक्त केली आहे.

सुशांतसिंह प्रकरणात ठाकरे सरकारमधील एका युवा मंत्र्याचा सहभाग आहे, असा भाजपचा आरोप आहे. त्यामुळं हा तपास सीबीआयकडे द्यावा, अशी मागणी भाजपनं सुरुवातीपासूनच लावून धरली होती. सत्ताधारी महाविकास आघाडीने हे आरोप फेटाळतानाच सीबीआय चौकशीची गरज नसल्याचं म्हटलं होतं. खुद्द शरद पवारांनीही मुंबई व महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास असल्याचं म्हटलं होतं. अर्थात, कोणाला सीबीआय चौकशी करायचीच असेल तर आमची हरकत नसल्याचं मतही त्यांनी मांडलं होतं. त्यानंतर आता हा तपास न्यायालयानंच सीबीआयकडे सोपवला आहे.

अधिक वाचा  भाजपचे मोठे यश? 8 उमेदवारांची माघार;मतदानापूर्वीच बिनविरोध निवड; काँग्रेसची मात्र यामुळे झाली नामुष्की

या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी महत्त्वपूर्ण ट्वीट केलं आहे. आपल्या ट्वीटमध्ये ते म्हणतात, ‘सर्वोच्च न्यायालयाने सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश दिला आहे. मला खात्री आहे की महाराष्ट्र सरकार या निर्णयाचा आदर करून चौकशी प्रक्रियेत पूर्ण सहकार्य करेल.’

दुसऱ्या एका ट्वीटमध्ये त्यांनी केंद्र सरकारला टोला हाणला आहे. ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआय मार्फत २०१४ मध्ये सुरू करण्यात आली आहे. मात्र, अद्याप सीबीआय त्यात कुठल्याही ठोस निष्कर्षाप्रत येऊ शकलेली नाही. त्यामुळं या चौकशी प्रक्रियेप्रमाणे सुशांतसिंह प्रकरणाच्या तपासकार्याची परिणती होऊ नये,’ अशी अपेक्षा पवारांनी व्यक्त केली आहे.

अधिक वाचा  मराठयांच्या पदरी निराशाच? नवं १०% आरक्षण धोक्यात? आधी झापलं नंतर चिरफाड अन् दबावात थेट पुन्हा तारीख

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रणेते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची २०१३ साली हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात हिंदुत्ववादी संघटनांचा हात असल्याचे आरोप आहेत. काही आरोपींना अटकही करण्यात आली आहे. जनरेट्यामुळं हा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. मात्र, सहा वर्षांनंतरही सीबीआय कुठल्याही निर्णयाप्रत येऊ शकलेली नाही. त्याचीच आठवण पवारांनी सुशांतच्या निमित्तानं करून दिली आहे.