बिहारमध्ये पुन्हा एनडीएचं सरकार स्थापन झालं आहे. परंतु अजून बहुमत चाचणी बाकी आहे. त्यापूर्वीच पुन्हा एकदा भूकंप घडविण्यासाठी काही राजकीय नेते सरसावले असल्याचं मीडिया रिपोर्टवरुन दिसून येतंय. जीतनराम मांझी यांना काँग्रेसने मुख्यमंत्री पदाची ऑफर दिल्याची माहिती पुढे येतेय.
बिहारमध्ये नितीश कुमारांनी ‘आरजेडी’ची साथ सोडून भाजपसोबत घरोबा केला. नुकतंच त्यांचा शपथविधी पार पडला. त्यांच्यासह आठ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. भाजपच्या दोन आमदारांना उपमुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली आहे.
त्यातच जीतनराम मांझी यांच्या त्यांच्या हिंदुस्थान आवाम मोर्चा या पक्षासाठी आणखी दोन मंत्रिपदं मागितली आहेत. दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अखिलेश प्रसाद सिंह यांनी मांझींना खुली ऑफर दिली आहे. ते म्हणाले की, ते जर आमच्यासोबत आले तर आम्ही त्यांना मुख्यमंत्री बनवू. या ऑफरनंतर बिहारच्या राजकारणात पुन्हा खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी आरजेडीचे प्रवक्ते मृत्यूंजय तिवारी यांनी म्हटलं की, सगळ्या गोष्टींना सार्वजनिक करता येणार नाही. तेजस्वी यादव हे धक्का देण्यासाठी ओळखले जातात. त्यांनीच स्पष्ट केलंय की अजून खेळ शिल्लक आहे. HMचे अध्यक्ष संतोष सुमर यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तसेच अपक्ष आमदार सुमित सिंह यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यातच आता मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी जीतनराम मांझी यांनी दोन मंत्रिपदं मागितली आहे.
नितीश कुमार यांच्यासह शपथ घेतलेले मंत्री
सम्राट चौधरी (भाजप)
विजय कुमार सिन्हा (भाजप)
डॉ. प्रेम कुमार (भाजप)
विजय कुमार चौधरी (जेडीयू)
बिजेंद्र प्रसाद यादव (जेडीयू)
श्रावण कुमार (जेडीयू)
संतोष कुमार सुमन (HAM)
सुमित कुमार सिंग (अपक्ष)
”मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर पण…”
जीतनराम मांझी यांना आधीच मुख्यमंत्री पदाची ऑफर होती, परंतु त्यांनी ती फेटाळली. मांझी म्हणाले की, महाआघाडीने दिलेली मुख्यमंत्रीपदाची ऑफर मी स्वीकारली नाही. तरीही मला दोन मंत्रिपदं मिळाली तर माझ्यावर अन्याय होईल. मी अमित शाह, नितीश कुमार आणि नित्यानंतद राय यांच्यासह इतरांशी चर्चा केली आहे.
संतोषकुमार सुमन हे मांझी यांचे पुत्र आहेत. त्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतलीय. तरीही जीतनकुमार आणखी दोन मंत्रिपदं मागत आहेत. त्यामुळे बिहारच्या सत्तासंघर्षात आणखी काही नवीन बघायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.