लंडन : रोहित शर्माच्या शानदार शतकाच्या जोरावर टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टमध्ये धमाकेदार विजय मिळवला आहे. पहिल्या इनिंगमध्ये 99 रननी मागे राहिल्यानंतर भारताने ही मॅच 157 रनने जिंकली. रोहित शर्माने या मॅचच्या दुसऱ्या इनिंगमध्ये 127 रनची खेळी केली. या कामगिरीबद्दल रोहितला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. हे माझ्या करियरमधल्या सर्वोत्तम शतकांपैकी एक होतं. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलनंतर आम्हाला 20-25 दिवसांचा वेळ मिळाला. ही तयारी आमच्यासाठी गेम चेंजर ठरले, असं रोहितने सांगितलं. 5 टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये भारताने 2-1 ने आघाडी मिळवली आहे. आता 10 सप्टेंबरपासून मॅनचेस्टरमध्ये सीरिजच्या अखेरच्या टेस्टला सुरुवात होणार आहे.
‘मला मैदानात राहायचं होतं, पण शतक करणं स्पेशल होतं. 100 रनने मागे राहिल्यानंतर 370 रनचं आव्हान देणं महत्त्वाचं होतं. पूर्ण टीम शानदार खेळली. हे परदेशातलं माझं पहिलं टेस्ट शतक आहे. माझ्या सर्वोत्तम शतकांपैकी हे एक निश्चितच आहे. मी शतकाबाबत विचार करत नव्हतो. आम्ही दबावात होते, पण परिस्थितीनुसार बॅटिंग केली,’ अशी प्रतिक्रिया रोहितने दिली. रोहित केएल राहुलनंतर शतक करणारा दुसरा भारतीय बॅट्समन आहे.
‘माझ्या डोक्यात काहीच नव्हतं. फक्त टीमला चांगल्या स्थितीमध्ये पोहोचवायचं होतं. मी मधल्या फळीत बॅटिंग करायचो, त्यामुळे ओपनिंग किती महत्त्वाची आहे, हे मला माहिती होतं. तुम्हाला आव्हान स्वीकारावं लागतं. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलनंतर आमच्याकडे 20-25 दिवस होतं, तेच आमच्यासाठी गेम चेंजर ठरले. या दरम्यान आम्ही चोख तयारी केली,’ असं रोहितने सांगितलं.
दुसऱ्या क्रमांकावर रोहित
रोहित शर्माने या सीरिजच्या 4 टेस्टच्या 8 इनिंगमध्ये 53 च्या सरासरीने 368 रन केल्या, यात एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. सीरिजमध्ये सगळ्यात जास्त रन करणाऱ्या खेळाडूंमध्ये तो दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रूट (Joe Root) 3 शतकं आणि एका अर्धशतकासह 564 रन करत पहिल्या क्रमांकावर आहे. केएल राहुलने (KL Rahul) एक शतक आणि एका अर्धशतकाच्या मदतीने 315 रन केले. इतर कोणत्याही बॅट्समनला 300 रनचा आकडाही गाठता आलेला नाही.