मुंबई: परराज्यातील मजूर आणि कामगांराना त्यांच्या राज्यात परत पाठवत असतानाच, आपल्या महाराष्ट्रातील मुंबई, पुणेसारख्या शहरांमध्ये कामानिमित्त आलेल्यांवर मात्र अन्याय करीत आहोत. विदर्भ, कोकण, मराठवाडा, खान्देश, पश्चिम महाराष्ट्रातील विशेषतः कोल्हापूर, सांगली, सातारा या पट्ट्यातील; तसेच कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यांतील श्रमिक, चाकरमान्यांना त्यांच्या मूळ गावी मोफत पाठवण्याची व्यवस्था करा, अशी विनंती भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली.
‘आपण राज्य सरकारतर्फे परराज्यांतील मजूर व कामगारांना त्यांच्या राज्यात परत पाठवण्याचे नियोजन करत आहात. त्यामध्ये वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी गर्दी करून आरोग्याची काळजी घेतली जात नसल्याची बाब समोर आली आहे. त्याकडे वेळीच सरकारने लक्ष देणे आवश्यक आहे. ४ मे रोजी भाभा रुग्णालयात मजुरांनी केलेल्या गर्दीने आरोग्याचे नियम पाळण्यात आले नाहीत, याकडेही शेलार यांनी लक्ष वेधले.
राज्यात जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्यात आल्यामुळे राज्यांतंर्गत अनेक श्रमिक, कामगार अडकून पडले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या सूचनांप्रमाणे आरोग्य तपासणी करून अशा श्रमिकांना तातडीने त्यांच्या मूळ गावी सोडल्यास त्यांची होणारी कुचंबणा व गैरसाय कमी होईल. यातील अनेक श्रमिक, मजूर हे जिल्ह्यांच्या सीमांवर अडकून पडले आहेत. त्यामुळे त्यांच्या अन्नपाण्याच्या सुविधेसह आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
आशिष शेलार, आमदार, भाजप
अनेक जण लहान खोल्यांमध्ये दाटीवाटीने राहत असून त्यांना आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. याच वर्गाने आजपर्यंत मुंबईतील गिरणी कामगारांपासून अनेक महत्वाच्या उद्योग व्यवसायांत आणि मुंबईच्या आर्थिक विकासात मोठा वाटा निभावला आहे. त्यामुळे सरकारने कोकण, पश्चिम महाराष्ट्र व अन्य भागांतून मुंबईत आलेल्या चाकरमान्यांना त्यांच्या मूळ गावी मोफत पाठविण्याची व्यवस्था तातडीने करावी. तसेच आरोग्याची काळजी घेण्यासाठी त्यांना त्यांच्या गावी क्वारंटाइन करण्याची व्यवस्था करण्यात यावी. जेणेकरून कोरोनाचा फैलावही रोखता येईल, असंही ते म्हणाले. या भागातील स्थानिक आमदारही वारंवार सरकारला याबाबत विनंती करत आहेत. त्यामुळे ही बाब लक्षात घेऊन सरकारने तातडीने याबाबत पावले उचलावीत, अशी विनंतीही त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

अधिक वाचा  रावसाहेब दानवे अन् अर्जुन खोतकर एकाच कार्यक्रमात, पण एकमेकांशी… ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण