महायुतीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराच्या निमित्ताने सासवडमध्ये महायुतीचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात शिवसेना नेते विजय शिवतारे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच मंचावर एकत्र आले. विशेष म्हणजे या दोन्ही नेत्यांचं मंचावर मनोमिलन होताना देखील बघायला मिळालं. ‘लोकांनी आमची दुश्मनी पाहिली, आता दोस्ती पाहुद्या’, असं विजय शिवतारे म्हणाले. विशेष म्हणजे त्यांनी अजित पवार यांचा उल्लेख माझे लाडके मित्र आणि स्नेही असा केला. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा “कोयनेच्या खोऱ्यातून ठाण्यात जाऊन आनंद दिघे यांच्या संपर्कात येऊन लोकांचे चांगलं काम करणारे मुख्यमंत्री”, असा केला.

“माझ्या मुलीनं महिला दिनाचा कार्यक्रम घेतला. तो ऑनलाइन कार्यक्रम होता. त्यात मी माझी लोकसभा लढविण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनतर लोकांच्या भावना येऊ लागल्या. मुख्यमंत्री एकनाथा शिंदे यांच्यासोबत चर्चा झाली आणि एक फोन आला की महायुतीला अडचण येईल. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आहेत. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचं आहे. माझा निर्णय बदलायचा स्वभाव नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ऐकलं. अजित पवार मनापासून काम करणारा नेता आहे. पण आपल्यामुळे अजित पवार बॅकफूटवर येऊ नये म्हणून मला मनातून वाटत होतं माघार घ्यावी. संघर्ष करून मिळणारे तहात मिळाले. ही बाब तुम्ही पुरंदरच्या पालखी मैदानावर येऊन सांगा”, असं विजय शिवतारे म्हणाले.

अधिक वाचा  …आम्ही काय चुना लावत बोंबलत बसू का? ; अजित पवारांचा खोचक टोला

‘लोकांना दोस्ती देखील पाहुद्या’

“मतदारसंघात लोकांचा मोठा रोष होता. राष्ट्रनिष्ठा ही बाब भाजपकडे असल्याने आम्ही सर्वजण एकत्र आहोत. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी एकत्र आलो. गुंजवणीच्या पाण्याने पुरंदरचा चेहरा मोहरा बदलणार आहे. एक वर्षाच्या आत गुंजवणी पाणी पुरंदरला मिळेल. राज्याच्या तिजोरीची चावी अजित दादांच्या हातात आहे. आमची दुश्मनी लोकांनी पाहिली होती. पण लोकांना दोस्ती देखील पाहुद्या”, असं सूचक वक्तव्य विजय शिवतारे यांनी केलं.

विजय शिवतारे यांची मागणी काय?

“पुरंदरला आयटी पार्क व्हावे ही देखील प्रमुख मागणी आहे. पुरंदर उपसासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 56 कोटी निधी मंजूर केलाय. पुरंदर उपसा योजना आता सुरळीत चालणार आहे. पिंपरी चिंचवड देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका अजित पवार यांच्यामुळे झाली. त्याच धर्तीवर फुरसुंगी देवाची उरुळी देखील नगरपालिका बनवावी”, अशी मागणी विजय शिवतारे यांनी केली.

अधिक वाचा  सीएंचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच कटिबद्ध ना. चंद्रकांतदादा पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांचा सीएंशी संवादात आश्वासन

‘बारामतीच्या विजयाचे लीड पुरंदर असेल’, शिवतारेंचं आश्वासन

“मिर्झाराजे यांनी देखील 1665 ला तह केला होता. कधीही आपला निर्णय न बदलणारा विजय शिवतारेवर लोकांचा विश्वास आहे. संघर्ष न करता एवढं मिळालं. त्यामुळे माझं भविष्याचं राजकारणाचा काय होईल माहीत नाही. मी मुख्यमंत्र्यांचा शब्द ऐकला आहे. आता मुख्यमंत्री तुम्ही माझी काळजी घ्याल. बारामतीच्या विजयाचे लीड पुरंदर असेल”, असं आश्वासन विजय शिवतारे यांनी दिलं.