काँग्रेस नेते संजय निरुपम यांच्यासाठी अत्यंत वाईट आणि धक्का देणारी बातमी समोर आली आहे. संजय निरुपम यांना पार्टीतून बडतर्फ करण्याचा प्रस्ताव आजच्या काँग्रेसच्या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच काँग्रेसकडून संजय निरुपम यांचं नाव स्टार प्रचारक यादीतून देखील हटवण्यात आलं आहे. महाराष्ट्र काँग्रेसने संजय निरुपम यांच्या बडतर्फचा प्रस्ताव आता दिल्ली हायकमांडला पाठवला आहे. आता दिल्लीतच त्यांच्यावर कारवाई करण्याबाबतचा अंतिम निर्णय होणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज संजय निरुपम यांचं नाव काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून काढून टाकल्याची माहिती दिली.

“संजय निरुपम यांचं नाव स्टार प्रचारकांमध्ये होतं. पण ते नाव आता रद्द करण्यात आलं आहे. ते ज्याप्रकारे वक्तव्य करत आहेत त्यावर कारवाई केली जाईल”, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे. दरम्यान, संजय निरुपम हे उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून उमेदवारीसाठी आग्रही आहेत. पण ठाकरे गटाने या मतदारसंघातून उमेदवार जाहीर केल्याने निरुपम नाराज आहेत. याच नाराजीतून ते शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची देखील राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

अधिक वाचा  ‘मोहोळ यांच्या विजयाची औपचारिकता बाकी’ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास; प्रचंड गर्दीत मोहोळ यांचा अर्ज दाखल

संजय निरुपम यांची ठाकरे गटाच्या उमेदवारावर उघडपणे टीका

संजय निरुपम यांना काँग्रेसच्या तिकीटावर उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघावर निवडणूक लढवण्याची तीव्र इच्छा आहे. पण या जागेवर ठाकरे गटाकडून उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. ठाकरे गटाने या जागेतून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी दिली आहे. पण संजय निरुपम यांनी उघडपणे ठाकरे गटाच्या उमेदवाराला विरोध केला आहे. अमोल कीर्तिकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यांच्यावर खिचडी घोटाळ्याचे आरोप आहेत. त्यामुळे आपण कीर्तिकर यांच्यासाठी प्रचार करणार नाही, अशी भूमिका निरुपण यांनी घेतली आहे.

संजय निरुपम शिंदे गटात जाणार?

अधिक वाचा  शरद पवार पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित ; गॅस सिलेंडर 500 रुपयांना देणार तर कंत्राटी भरती बंद… जाणून घ्या थोडक्यात

“माझ्याकडे पर्यायांची कमतरता नाही. मी आठवडाभर वाट बघेन आणि मग निर्णय घेईन”, असं सूचक वक्तव्य संजय निरुपम यांनी अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर केलं होतं. त्यांनी याच मुद्द्यावरुन काँग्रेस हायकमांडलाही इशारा दिला होता. त्यांच्याकडून सातत्याने ठाकरे गटावर केली जाणारी टीका पाहता अखेर महाराष्ट्र काँग्रेसकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर आता संजय निरुपम खरंच शिंदे गटात प्रवेश करतात का? ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.