काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर काढलेल्या भारत जोडो यात्रेनंतर आता याची दुसरी आवृत्ती ‘भारत न्याय यात्रा’ जानेवारीत सुरु होणार आहे. ही ६,००० किमी पायी यात्रा असणार आहे.

पहिल्या यात्रेचा अनेक राज्यांतून प्रवास झाल्यानं राहुल गांधींना त्याचा चांगला राजकीय फायदाही झाला होता. या यात्रेमुळं कर्नाटकची सत्ता काँग्रेसला मिळाली होती. त्यामुळं आता दुसऱ्या टप्प्यातील यात्रेचा काँग्रेसला किती फायदा मिळतो हे पहाणं महत्वाचं ठरणार आहे.

भारत न्याय यात्रा

मणिपूर ते मुंबई अशी भारताच्या पूर्व-पश्चिम टोकांना जोडणारी ही भारत न्याय यात्रा असणार आहे. या तब्बल ६,२०० किमी अंतर पायी यात्रेत राहुल गांधींसोबत विविध क्षेत्रातील लोक सहभागी होऊ शकतात. ही यात्रा १४ राज्यांमधून ८५ जिल्ह्यांतून मार्गक्रमण करणार आहे. यामध्ये मणिपूर, नागालँड, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र हा राज्यांतून ही यात्रा जाणार आहे.

अधिक वाचा  नाशिकला ना भुजबळ, ना गोडसे; दोघांच्या भांडणात यांना उमेदवारीचा लाभ! मराठा समाजही राहणार सोबत?

मकरसंक्रांतीपासून होणार सुरुवात

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून १४ जानेवारी २०२४ रोजी अर्थात मकरसंक्रांतीपासून या यात्रेला सुरुवात होणार आहे. जास्तीत जास्त लोकांना या यात्रेत सहभागी होता यावं बसनेच ही यात्रा चालणार आहे. तर पदयात्रेदरम्यान छोट्या छोट्या अंतरासाठी चालण्याचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे, असं काँग्रेसकडून पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं आहे.