मुंबईः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. शिंदेंनी कुटुंबासह दोन्ही नेत्यांची भेट घेतली. त्यानंतर ट्वीटर वॉर सुरु झालेलं आहे. श्रीकांत शिंदेंनीही उद्धव ठाकरेंचं नाव न घेता खोचक टोला लागावला. शिंदेंच्या दिल्लीवारीवर संजय राऊत आणि यशोमती ठाकूर यांनी जोरदार हल्ला चढवला. श्रीकांत शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ट्वीटला रिट्वीट करत ”कष्ट टाळू मुख्यमंत्री ते ‘कष्टाळू’ मुख्यमंत्री.. महाराष्ट्राचा बदलता राजकीय प्रवास!” असं म्हटलं आहे.दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या ट्वीटला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिट्वीट करत ”महाराष्ट्राचे गतिशील आणि कष्टाळू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांना आणि त्यांच्या कुटुंबाला भेटून आनंद झाला. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठीची त्यांची तळमळ आणि विनम्र स्वभाव कौतुकास्पद आहे.” असं मोदींनी म्हटलं.

अधिक वाचा  छत्रपती संभाजीनगरमधल्या राड्यानंतर मनसेचा थेट इशारा; म्हणाले, आमच्या नादी लागू नका, नाहीतर…

एकनाथ शिंदेंचं ट्वीट काय होतं?

देशाचे पंतप्रधान म्हणून कणखर आणि सक्षम असलेल्या मा. नरेंद्रजी मोदी यांनी माझे वडील, पत्नी, मुलगा खासदार, सून आणि नातू यांच्यासह मला सदिच्छा भेटीला बोलावून आपलेपणाने विचारपूस केली. माझ्या कुटुंबाशी निवांत गप्पा मारल्या. त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून आमच्यासाठी वेळ काढला.शिंदे पुढे म्हणतात, महाराष्ट्रातील जनतेचे आयुष्य सुखकर करण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या विकासकामांबाबत त्यांनी यावेळी चर्चा केली. इर्शाळवाडीतील दुर्घटनेमुळे राज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्याबाबत सहवेदना व्यक्त करत या संकटात केंद्र सरकार पाठीशी असल्याचे ते म्हणाले. तसेच बचावकार्य आणि पुनर्वसनाबाबत माहिती घेतली.

अधिक वाचा  ‘केजरीवालांच्या बंगल्यात मला लाथा-बुक्क्यांनी मारहाण’, स्वाती मालिवाल यांनी सोडलं मौन

धारावी पुनर्विकास हा सर्वात मोठा प्रकल्प असून त्यामुळे मुंबईचा चेहरा बदलणार आहे. त्याचबरोबर गरीब नागरिकांना सुखाचे आयुष्य जगता येणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प विनाअडथळा वेगाने पूर्ण करावा, रखडलेले पुर्नविकास प्रकल्प मार्गी लावावेत, असे त्यांनी सांगितले. पायाभूत सुविधांना बळ मिळाले की राज्याच्या समृद्धीचा मार्ग प्रशस्त होतो. त्यामुळे राज्यातील असे प्रकल्प त्वरित पूर्ण करावेत, अशी सूचना त्यांनी केली. याशिवाय वारंवार होणारी अतिवृष्टी, त्यामुळे येणारी संकटे यावर आस्थेवाईकपणे चर्चा केली.

सीएम ट्वीटमध्ये पुढे म्हणतात, कोकणात उदंड पाऊस पडून पाणी समुद्राला मिळते. हे पाणी दुष्काळग्रस्त भागात कसे वळवता येईल, मराठवाडा वॉटर ग्रीड या राज्य सरकारच्या योजनांबाबतही त्यांनी यावेळी माहिती घेतली. याशिवाय राज्यातील आरोग्य व्यवस्था, उपलब्ध शैक्षणिक सुविधा, आवश्यक बदल या मुद्द्यांवरही त्यांनी चर्चा केली.

अधिक वाचा  पुण्यात गोंधळ, आंदोलन अन् प्रशासनावर संताप, मतदानातील घडामोडींची जाणून घ्या सविस्तर माहिती

गेले वर्षभर केंद्र सरकारचे भक्कम पाठबळ राज्य सरकारला मिळत आहे. ते सहकार्य यापुढेही कायम मिळो, ही मागणी मान्य करत पंतप्रधानांनी आश्वस्तही केले. पंतप्रधानांची आपुलकी, आशीर्वादाचा हात आणि आस्था नवे बळ देणारी आहे, असं शिंदेंनी म्हटलं आहे.