विरोधी पक्षनेते अजित पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत या दोन नेत्यांमधील मतभेद कमी होण्याचे नाव घेत नाहीत. आज अजित पवारांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना संजय राऊतांविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना, कोण संजय राऊत? असं अजित पावर म्हणाले. प्रत्येक प्रवक्त्यानं आपापल्या पक्षावर बोलावं, हे म्हणताना मी कुणाचं नाव घेतलं नव्हतं, मग कुणाच्या अंगाला का लागावं, असंही अजित पवार म्हणाले.

मी कोणाचे नाव घेतले होते का ?
प्रसारमाध्यमांनी अजित पवारांना संजय राऊत अजुनही तुमची बाजू मांडतायत असा प्रश्न केला होता. त्यांच्या या प्रश्नाला उत्तर देताना कोण संजय राऊत ? मी कोणाचे नाव घेतले होते का ? मग मी का अंगाला लावून घेऊ असे अजित पवार म्हणाले. माझ्याबाबतच्या असणाऱ्या शंका-कुशंका डोक्यातून काढून टाका असं आवाहन अजित पवारांनी माध्यमांना केलं. माझ्या बाबतीत शंका कुशंका डोक्यातून काढा. सकाळ पेपरला विचारा. सकाळ पेपरचा कार्यक्रम आधीपासून ठरला होता असेही अजित पवार म्हणाले.

अधिक वाचा  घाटकोपरमधील १४ जणांचा बळी घेणाऱ्या कंपनीचा मालकाचा उद्धव ठाकरे यांच्या सोबतचा फोटो व्हायरल, भाजपने विचारला थेट सवाल

नेमकी सुरुवात कशी झाली?
मागील तीन दिवसापूर्वी अजित पवार यांच्याबाबत सुरु असलेल्या चर्चांवर त्यांनी स्पष्टीकरण दिले होते. यावेळी बोलताना अजित पवारांनी नाव न घेता संजय राऊतांना फटकारले होते. आमच्या पक्षाची बाजू मांडण्यासाठी आमचे प्रवक्ते आहेत. आमच्या पक्षाचे वकिलपत्र इतर कोणी घेऊ नये असे अजित पवार म्हणाले होते. त्यावर संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिली होती. मी सत्य बोलत राहणार आहे. मी कोणाला घाबरणार नसल्याचे संजय राऊत म्हणाले होते.

सामना नेहमी सत्य लिहितो : संजय राऊत
जेव्हा शिवसेना फुटली तेव्हाही तुम्ही आमची वकिली करत होता. मला जरी कोणी टार्गेट करत असेल तरी मी सत्यच बोलणार. मी कदापी मागे हटणार नाही. सामना नेहमी सत्य लिहितो. अनिल देशमुख असतील जितेंद्र आव्हाड असतील अशी किती जणांची नावं आहेत की त्यांच्यावर यंत्रणांचा दबाव आहे. जे सत्य आहे ते मी लिहित राहणार आणि बोलतच राहणार असल्याचे राऊत म्हणाले. महाराष्ट्रात विरोधी पक्ष फोडण्याचे काम सुरु आहे. हे सत्य आहे की असत्य आहे अजित पवार यांनी सांगायला पाहिजे असे संजय राऊत म्हणाले. या सर्व बातम्यांची मी माहिती ठेवतो यामध्ये गैर काय असेही राऊत म्हणाले. मी लिहलेलं टोकदार सत्य जर कोणाला टोचत असेल तर मी काय करु असेही राऊत म्हणाले.