नवी दिल्ली: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी भारत-चीन सीमावादावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. नरेंद्र मोदी हे वास्तवात सरेंडर मोदी आहेत असे राहुल म्हणाले होते. त्यांच्या या विधानावर भारतीय जनता पक्षाने पलटवार केला आहे. या बरोबर राहुल यांनी सरेंडरची स्पेलिंग चुकीचे लिहिल्याने त्यावरही टीका होऊ लागली आहे.
राहुल गांधी यांनी ज्या भाषेचा वापर केला आहे, अशी भाषा शत्रू देशातील नेते देखील वापरत नाहीत, असे भारतीय जनता पक्षाने म्हटले आहे. राहुल गांधी यांनी आपल्या या वक्तव्यासाठी माफी मागितली पाहिजे, असे आवाहन भारतीय जनता पक्षाने केले आहे. राहुल गांधी सर्व मर्यादा तोडल्याचेही भाजप म्हणाला आहे.
भाजप नेते शाहनवाज हुसैन यांनी राहुल गांधी यांच्या या वक्तव्याला उत्तर दिले आहे. देशाचे लोकप्रिय नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी कांग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे ज्या शब्दांचा वापर करत आहेत, तसे शब्द शत्रू देशातील एखादा नेताही पंतप्रधान मोदींसाठी वापरत नाही. मात्र, राहुल गांधी हे सतत ‘पंतप्रधान’ आणि ‘देश’ अशा दोघांचाही अपमान करत आहेत, असे शाहनवाज म्हणत आहेत.
तर दुसरीकडे, जम्मू आणि काश्मीरचे भाजपचे प्रमुख रविंदर रैना यांनीही पंतप्रधान मोदी यांना ‘सरेंडर मोदी’ असे म्हटल्याबाबत राहुल गांधी यांच्यावर पलटवार केला आहे. राहुल गांधी यांच्या पूर्वजांनी चीनसमोर आत्मसमर्पण केले आणि देशाला मागे सारले आहे, असे गांधी-नेहरू कुटुंबावर हल्ला करताना रविंदर रैना यांना म्हटले आहे.
दरम्यान, काँग्रेस पक्षाने राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसचे प्रवक्ता पवन खेडा यांनी राहुल गांधी यांचा बचाव करत मोदी सरकारवर गलवान खोऱ्यातील परिस्थिती हाताळण्यात अपयश आल्याचे म्हणत टीकास्त्र सोडले.
लडाखमध्ये एलएसीवर चीनी सैनिकांनी भारतीय जवानांवर केलेल्या हिंसक हल्ल्यात एकूण २० भारतीय शहीद झाले. यावरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सतत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल करत आहेत. भारतीय जवानांच्या हौतात्म्याबाबत राहुल गांधी सतत केंद्र सरकारला सवाल करत आहेत.

अधिक वाचा  भाजपचे मोठे यश? 8 उमेदवारांची माघार;मतदानापूर्वीच बिनविरोध निवड; काँग्रेसची मात्र यामुळे झाली नामुष्की