रायगडः बुधवारी रात्री रायगड जिल्ह्यातल्या इर्शाळवाडी येथे दरड कोसळून अनेक घरं मलब्याखाली गेली होती. आज हे सर्च ऑपरेशन थांबवण्यात आलेलं आहे.सर्च ऑपरेशन आजपासून थांबवण्यात आल्याचं पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून जाहीर करण्यात आलेलं आहे. खालापूर पोलिस ठाण्यात सर्व अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.इर्शाळवाडीत आतापर्यंत 27 मृतदेह सापडले आहेत. परंतु 57 जण बेपत्ता आहेत. त्यांना मृत घोषित करून आजपासून एनडीआरएफचे सर्च ऑपरेशन थांबवण्यात आले आहे. दरम्यान, बचावलेल्या 144 लोकांचे लवकरात लवकर पुनर्वसन केले जाईल, असे पालकमंत्री सामंत यांनी स्पष्ट केले.

अधिक वाचा  कोथरूड शिवसेनेला धक्के सुरूच; शाखाप्रमुख, 3 वेळा उपविभाग प्रमुख बाप्पूचा शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र

बुधवारी रात्री ११ वाजता इर्शाळवाडी गावावर दरड कोसळली आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरुन गेला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहाटेच घटनास्थळी पोहोचले आणि यंत्रणा कामाला लागली. इर्शाळवाडी गडावर असल्याने तिथे यंत्रसामुग्री पोहोचू शकत नव्हती.

मनुष्यबळाच्या जोरावरच बचावकार्य सुरु झालं. या घटनेमध्ये आतापर्यंत २७ जणांचे मृतदेह सापडेलेल आहेत. तर १४४ जास्त जणांना वाचवण्यात आलंय. परंतु ज्यांचे मृतदेहच सापडले नाहीत अशा अंदाचे ५७ जणांना प्रशासन मृत घोषित करणार आहे.