मनमाड बाजार समितीच्या निवडणुकीत आज उमेदवारी माघारीवरून आमदार सुहास कांदे आणि त्यांचे विरोधक शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या समर्थकांत मोठी मारामारी झाली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या टेबलवर चढून कार्यकर्ते हल्ला करीत होते. त्यामुळे वातावरण तंग झाले होते. मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आज माघारीच्या दिवशी अर्ज माघारीवरून दोन गटात बाचाबाची होऊन हाणामारी झाली. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सिद्धार्थ मोरे यांच्या समोरच राडा झाल्याने एकच गोंधळ उडाला. त्यात शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते गणेश धात्रक समर्थकांत हाणामारी झाल्याचे बोलले जाते.
माघारीच्या शेवटच्या दिवशी ८४ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. आता ४१ उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत. माघारीच्या शेवटच्या दिवशी आज बाजार समितीच्या कार्यालयात उमेदवारांनी गर्दी केली होती. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ सिद्धार्थ मोरे निवडणूक कार्यालयात माघारीचे अर्ज स्वीकारत होते. मात्र अशोक डगळे या उमेदवाराने चार जागांवर अर्ज दाखल केला होता. त्याची मुलगी आणि अनुमोदक, सूचक तीन अर्ज मागे घेण्यासाठी आले होते. मात्र दोन्ही गटाच्या लोकांनी माघारी होऊ नये यासाठी वादास सुरवात केली.
त्यावर आक्षेप घेत अर्ज स्वीकारू नये यावरून आणि दोन्ही गटाचे समर्थकांनी परस्परांकडे रागाने पाहिल्याचे कारण पुढे करत बाचाबाचीला सुरुवात झाली. काही वेळातच बाचीबाचीचे रूपांत प्रचंड हाणामारीत झाले. दोन्ही गट एकमेकांना समोरासमोर भिडल्यामुळे चांगलाच गोंधळ उडाला. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ मोरे यांच्या टेबलवर चढून मारामारी सुरु होती!
मारामारीमुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. पोलिस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांनी तात्काळ हस्तक्षेप करीत परिस्थिती आटोक्यात आणली. त्यानंतर पुन्हा अर्ज माघारीची प्रक्रिया सुरळीतपणे सुरू करण्यात आली. त्यानंतर दोन्ही गटाच्या नेत्यांनी आपापल्या गटाच्या कार्यकर्त्यांना समजावून बाहेर काढून दिले.
यावेळी चंद्रकांत गोगड, गंगाधर बिडगर, गणेश धात्रक, पिंटू नाईक, माधव शेलार, संजय कटारिया, विजय मिश्रा, पिंटू कटारे, कैलास गवळी, विनय आहेर, सुनील पाटील यांच्यासह युवासेनेचे जिल्हाप्रमुख फरहान खान, जिल्हाप्रमुख किरण कवडे, योगेश पाटील, साईनाथ गिडगे, मयूर बोरसे, सुनील हांडगे, राजेंद्र भाबड, डॉ संजय सांगळे, प्रकाश घुगे, किशोर लहाने, सतीश पाटील, राजेंद्र पवार यांच्यासह शेतकरी, कार्यकर्ते उपस्थित होते.
मनमाड बाजार समितीच्या १८ जागांसाठी निवडणूक होत असून त्यासाठी १२५ उमेदवारांनी अर्ज भरले होते. आज ८४ उमेदवारांनी माघार घेतली. आता ४१ उमेदवार रिंगणात आहेत. माघार झाल्यामुळे उद्यापासून पॅनल निर्मितीची प्रक्रिया सुरू होईल. लवकरच पॅनलची घोषणा होईल. आमदार सुहास कांदे यांनी मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत पॅनेल तयार करीत आहेत. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे माजी आमदार पंकज भुजबळ, संजय पवार, काँग्रेसचे अनिल आहेर, जगन्नाथ धात्रक, राजेंद्र देशमुख हे पाच आमदार आणि शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांनी कडवी झुंज उभी केली आहे.