महसूल खात्याने उपविभागीय अधिकाऱ्यांपाठोपाठ आता तहसीलदारांच्याही बदल्या करण्यास सुरुवात केली आहे. पुणे विभागातील ३२ तहसीलदारांच्या बदल्या करण्यात आल्या असून, त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील १३ तहसीलदारांचा समावेश आहे. बारामतीच्या तहसीलदारपदी गणेश शिंदे, पिंपरी-चिंचवडच्या तहसीलदारपदी अर्चना निकम, मुळशीसाठी रणजित भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यासंदर्भात महसूल विभागाचे सहसचिव डॉ. माधव वीर यांनी आदेश जारी केले आहेत. मातब्बर तहसीलदारांना पुणे विभागाबाहेरचा रस्ता दाखविण्यात आल्याची चर्चा यानिमित्ताने आहे.
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदारांच्या बदल्या करण्यात येत आहेत. या निमित्ताने महसूल खात्यात बदल्यांची मोहीम सुरू झाली आहे. वेल्हा तहसीलदारपदी दीनेश पारगे, पुणे नागरी समूह तहसीलदारपदी सुनीता आसवले, विभागीय आयुक्त कार्यालय सर्वसाधारण शाखेच्या तहसीलदारपदी मनीषा कुलकर्णी, शेती महामंडळ येथे रूपाली रेडेकर, जिल्हा पुर्नवसन शाखेत तहसीलदारपदी संजय पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मातब्बरांची विदर्भ, मराठवड्यात बदली
राज्य सरकारने बदल्या करताना यंदा मातब्बर अधिकाऱ्यांना थेट पुणे विभागाबाहेरचा रस्ता दाखविला आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. अनेक मातब्बर तहसीलदारांना गडचिरोली, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, अमरावती जिल्ह्यांत पाठविले आहे. वेल्ह्याचे तहसीलदार शिवाजी शिंदे यांची चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे अप्पर तहसीलदार म्हणून, तर मुळशीचे तहसीलदार अभय चव्हाण यांची छत्रपती संभाजीनगर विभागातील शिरूर कासार येथे बदली करण्यात आली आहे. मावळचे तहसीलदार मधुसुदन बर्गे यांची बदली धानोरा (जि. गडचिरोली) येथे करण्यात आली आहे. बालाजी सोमवंशी यांची बदली नागपूर जिल्ह्यात, आंबेगावच्या तहसीलदार रमा जोशी यांची बदली अमरावती जिल्ह्यात, तर बारामतीचे तहसीलदार विजय पाटील यांची बदली चंद्रपूर जिल्ह्यात करण्यात आली आहे.