पुणे : राज्यातील तापमानात आठवडाभरापासून बदल होत आहे. कधी ऊन वाढत आहे तर कधी राज्यात अवकाळी पाऊस होता आहे. पुढील तीन- चार दिवस पुन्हा राज्यात अवकाळी पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. विजांचा कडकडाटासह हा पाऊस होणार आहे. तसेच राज्यातील काही भागात गारपीट होणार असल्याचे हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ के.एस.होसाळीकर यांनी म्हटले आहे. गारपीटमुळे शेतकऱ्यांसमोर संकट होणार आहे.
येथे गारपीटची शक्यता
पुणे शहरात हवेतील विसंगतीमुळे वातावरणात बदल झाला आहे. ही विसंगती बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या बदलामुळे होत आहे. पुढीत तीन-चार दिवस तापमान कमी राहणार आहे. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत गारपीट होण्याचा अंदाज मुंबई हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यात विजांच्या कडकटासह अवकाळी पाऊस पडणार आहे. त्यानंतर 7, 8 आणि 9 तारखेलाही राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडणार आहे. काही ठिकाणी गारपीट होणार आहे.
वाशिममध्ये पाऊस
वाशिम जिल्ह्यात शुक्रवारी अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला होता. यामुळं गहू,ज्वारी,उन्हाळी मूग आणि भाजीपाला पिकांचं नुकसान झालं आहे. शनिवारी पुन्हा हवामान खात्याने वाशिम जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला असून वाशिम जिल्ह्यात वीजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
सोलापुरला पाऊस
सोलापूर शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पावसाच्या सरी बरसल्या आहेत. शनिवारी पहाटेच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. हवामान खात्याने सोलापूर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जाहीर केला होता.
बदलाचा आंब्याला फटका
बदलत्या हवामानाचा फटका हापूस आंब्याला बसत आहे. या बदलामुळे आंबे खराब होऊन गळू लागले आहेत. काही ठिकाणी उष्माघातामुळे फळ पिवळे पडत आहे. त्यामुळे गळ मोठ्या प्रमाणात होत असून बागायतदारांचे आर्थिक गणित विस्कटले असल्याने बागायतदार चिंतातूर झाले आहेत. वाढता उष्मा, अवकाळी पाऊस, वातावरणातील बदलाने हापूस उत्पादकांचे नुकसान होता आहे. सध्या वातावरणात उष्मा वाढला असून त्याचा परिणाम आता हापूसवर जाणवत आहे. सध्या झालेल्या फळधारणापैकी जवळपास ७५ टक्के हापूस हा गळून पडत आहे.