स्व. गोपीनाथराव मुंडे असते तर माझे अडीच वर्ष जेलमध्ये गेले नसते, पहाडासारखा हा माझा धाकटा भाऊ माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला असता. महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेसाठी हा नेता आजही आपल्यात पाहिजे होता. त्यामुळे शेवटचा श्वास असेपर्यंत त्यांचं काम सुरू ठेवू, असे आवाहन छगन भुजबळ यांनी करत भावूक झाले.

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या गोपीनाथ गड या स्मारकाचे व त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी भुजबळ म्हणाले की, लोकांसाठी काम केलेल्या व्यक्तीवर प्रेम करण्यासाठी हजारो लोक स्वयंस्फूर्तीने येत असतात. बहुजनांना एकत्र आणण्याचे काम गोपीनाथ मुंडे यांनी केले असून, ओबीसींची गणना झाली पाहिजे, मंडल आयोगाची अमलबजावणी झाली पाहिजेत यासाठी ते नेहमीच आग्रही राहिले. सर्व समाजाला न्याय देण्याची भूमिका घेणे, हीच स्व. गोपीनाथ मुंडे यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे त्यांनी सांगितले. गोपीनाथ मुंडे यांनी राज्यातील ओबीसीसह पीडित सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आयुष्यभर लढा दिला. त्यांनी सुरू केल्याल्या कामाची सर्व जबाबदारी आता माझ्यावर आणि तुमच्यावर आहे. त्यामुळे शेवटचा श्वास असेपर्यंत त्यांचं काम सुरू ठेवू असे प्रतिपादन छगन भुजबळ यांनी केले.

अधिक वाचा  कॅशलेस उपचार आणि बरंच काही; राज्याच्या आरोग्य विभागाचा महत्त्वाचा निर्णय 5 मुद्द्यांमध्ये

यावेळी बोलतांना छगन भुजबळ अतिशय भाऊक झाल्याचे बघावयास मिळाले. ते म्हणाले की, गोपीनाथराव मुंडे यांनी राज्यात सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं. त्यांचं अकाली जाणं हे आपल्यासाठी मोठा धक्का आहे. ज्यावेळी माजी खासदार समीर भुजबळ यांचे वडील माझे मोठे भाऊ मगण भुजबळ यांचं दुःखद निधन झालं. त्यावेळी मला अतिशय दुःख झालं होत. त्यानंतर माझे धाकटे भाऊ गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनानंतर माझा धाकटा भाऊही गेल्याने मला अतिशय तीव्र असे दुःख झाले अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. या भावना व्यक्त करत असताना ते अतिशय भाऊक झाले.

अधिक वाचा  महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप? राज्यात आणखी एक आघाडी, विरोधी पक्षाची कमतरता दूर करण्यासाठी तीन बडे नेते एकत्र

ओबीसी चळवळीसाठी महत्वपूर्ण योगदान
अतिशय लहान समाजातून पुढे येत मुंडे साहेबांचे नेतृत्व निर्माण झालं होत. आपलं आयुष्य सर्व सामान्य जनतेसाठी, कष्टकरी ऊसतोड कामगारांच्या हितासाठी अर्पण केलं. राज्यात माधव हा गट उभा करण्यात स्व. गोपीनाथ मुंडे यांनी मोलाचं योगदान दिलं. ओबीसी चळवळीसाठी त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिलं. खासदार समीर भुजबळ यांनी ओबीसींच्या जनगणनेचा प्रस्ताव पुढे ठेवला. तेव्हा आपल्या पक्षाच्या भूमिकेचा विचार लक्षात न करता ज्याप्रमाणे जनावरांची तुम्ही मोजणी करू शकता तर ओबीसी बांधवांची का नाही? असा सवाल लोकसभेत उपस्थित करत ओबीसींच्या जनगणनेसाठी त्यांनी लढा दिला. आज ते असते तर हा प्रश्न देखील लवकरच सुटला असता अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

माझे अडीच वर्ष जेलमध्ये गेले नसते….
गोपीनाथ मुंडे असते तर माझे अडीच वर्ष जेल मध्ये गेले नसते. पहाडासारखा हा माझा धाकटा भाऊ माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला असता. महाराष्ट्रातील गोर गरीब जनतेसाठी हा नेता आजही आपल्यात पाहिजे होता. राज्यातील गोर गरीब मागासवर्गीय जनतेचे सेवा करण्याचं काम त्यांनी केलं ते काम तुम्हाला आम्हाला पुढे न्यायचे आहे. त्यांचा वारसा आणि त्यांचं काम पंकजा मुंडे अतिशय प्रभावी पणे पुढे नेत असल्याचे त्यांनी सांगितले. राज्याच्या मुख्यमंत्री पदाची धुरा एकनाथ शिंदे समर्थपणे सांभाळत आहे. गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ओबीसी बांधवांच्या न्याय हक्कासाठी ते काम करतील आणि ओबीसींना योग्य न्याय देतील असा विश्वास आहे. तसेच गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्या स्मृतींचा उजाळा देण्याचे काम आपल्याला सातत्याने करावे लागेल असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

अधिक वाचा  तुझी ही जागा नाहीय…,मैदानात जसप्रीत बुमराह भिडला; सामना संपताच करुण नायर म्हणाला…