महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या घटना चिंतेचा विषय बनला आहे. गेल्या काही राज्यात शेतकरी आत्महत्येचं प्रमाण वाढलं आहे. कर्जाचा डोंगर नापिकी मुलाबाळांचं शिक्षण या तणावातून शेतकरी आत्महत्या करत असल्याच्या अनेक घटना उघडकीस येत आहे. बुलडाणा जिल्ह्यातून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
येथील एका तरुण शेतकऱ्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली आहे. ज्ञानेश्वर वासुदेव मुरुख असं या तरुण शेतकऱ्याचं नाव आहे. ज्ञानेस्वर हे संग्रामपूर तालुक्यातील बोडखा येथील रहिवासी असून त्यांनी पुण्यात गळफास घेत आपली जीवयात्रा संपवली.
महत्त्वाचे म्हणजे या शेतकऱ्यांने आत्महत्या करण्याअगोदर व्हॉटसअप वर स्टेटस ठेवले होते. “आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा” असे लिहून त्याने आत्महत्या केली आहे. मात्र आत्महत्येचे कारण अजूनही कळले नसून त्याने आत्महत्या का केली याचा शोध पोलीस घेत आहेत.
सिल्लोडमध्ये पुन्हा शेतकऱ्याची आत्महत्या
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या जिल्ह्यात आणि मतदारसंघात आठवड्याभरात तब्बल सहा शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं आहे. असे असताना सत्तार यांच्या सिल्लोड तालुक्यातील आणखी एका तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. बोदवड येथील तरुण शेतकऱ्याने विषारी औषध सेवन करुन आपली जीवनयात्रा संपवली. या प्रकरणी अजिंठा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आला आहे. नंदू भिमराव लाठे (वय 28 वर्षे रा.बोदवड ता.सिल्लोड) असे या शेतकऱ्याचं नाव आहे.
कृषीमंत्री सत्तार यांचं बेजबाबदार वक्तव्य!
एकीकडे कृषीमंत्री यांच्या जिल्ह्यात आणि मतदारसंघात शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. मात्र असे असताना यावर प्रतिक्रिया देताना सत्तार यांनी बेजबाबदार वक्तव्य केलं आहे. शेतकरी आत्महत्या काही आजचा विषय नाही, अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करतात, असे वक्तव्य सत्तार यांनी केले आहे. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यावरुन सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.