राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांना सक्तवसुली संचलनालयाकडून समन्स बजावण्यात आलं आहे. आज दिवसभरात आमदार मुश्रीफ यांच्या कागलमधील निवासस्थानी तब्बल साडे नऊ तास छापेमारी करत कसून चौकशी केली आहे. या चौकीनंतर अवघ्या काही तासांमध्येच ईडीकडून समन्स बजावण्याची कारवाई करण्यात आली आहे. मुश्रीफ यांना सोमवारी 13 मार्चला ईडी कार्यालयात हजर राहण्याची सूचना समन्सच्या माध्यमातून देण्यात आली आहे. आज दिवसभरातील कारवाईनंतर हसन मुश्रीफ यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे सोमवारी थेट चौकशीला सामोरे जाणार का? याकडे आता लक्ष लागले आहे. दरम्यान, आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर आज (11 मार्च) कागलमध्ये तिसऱ्यांदा छापेमारी केली. त्यामुळे मुश्रीफ अडचणीत आले आहेत का? अशी चर्चा आहे. आज कागलमधील निवासस्थानी मुश्रीफ यांच्या कुटुबीयांची साडे नऊ तास कसून चौकशी करण्यात आली. सायंकाळी 4 वाजून 35 मिनिटांनी ईडीचे पथक मुश्रीफांच्या घरातून बाहेर पडले.
दुसरीकडे, सलग होत असलेल्या चौकशीमुळे कुटुंबीय त्रस्त होऊन गेले आहेत. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना, अप्पासाहेब नलवडे साखर कारखाना कर्ज प्रकरणात ईडीकडून मुश्रीफांच्या कुटुबीयांची चौकशी सुरु आहे. आतापर्यंत मुश्रीफांची थेट चौकशी झालेली नाही. दोनवेळा ते घरी नसतानाच ईडीकडून छापेमारी झाली आहे. आतापर्यंत मुश्रीफांविरोधात ईडीकडून 35 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. तसेच मुरगूडमध्ये 40 कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यात त्यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.
न्यायालयाकडून दिलासा मिळाला असतानाच अवघ्या काही तासांमध्येच आज सकाळी ईडीचे पथक सकाळी सातच्या सुमारास मुश्रीफांच्या निवासस्थानी येऊन धडकले. तब्बल साडे नऊ तास ईडीचा फौजफाटा मुश्रीफांच्या घरी तळ ठोकून होता. यावेळी त्यांनी कुटुबीयांचे जबाब नोंदवून घेण्यासाठी प्रिंटर सोबत आणला होता. यावेळी मुश्रीफ यांच्या पत्नी, दोन मुले आणि नातवंडे उपस्थित होती.
ईडीचा दावा काय?
मुश्रीफ यांच्यावर झालेल्या कथित आरोपांममध्ये ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुश्रीफ आणि त्यांच्या निकटवर्तीयांनी 15 वर्षांपूर्वी बंद झालेल्या कंपनीच्या खात्यात 50 कोटी कॅश भरले होते. ते पैसे साखर कारखान्याच्या खात्यात वळवले होते. तसेच कोलकात्यातील काही शेल कंपन्यांचा वापर करुन काळा पैसा आपल्या खात्यात वळल्याचा आरोप ईडीने केला आहे. त्या कंपन्यांचे कनेक्शन हसन मुश्रीफ आणि त्यांच्या संबंधित असलेल्या साखर कारखान्यांशी जोडलं जात आहे. रजत प्रायव्हेट लिमिटेड, माऊंट कॅपिटल लिमिटेड या दोन्ही कंपन्या बंद पडल्या आहेत. जवळपास 15 वर्षापूर्वी या कंपन्या बंद पडल्या होत्या. या कंपन्यांमध्ये हसन मुश्रीफ आणि त्यांच्या निकटवर्तीयांनी 50 कोटी रुपयांची रक्कम भरल्याची माहिती ईडीच्या सुत्रांनी दिली आहे. ही रक्कम साखर कारखान्यामध्ये गुंतवल्याची माहिती मिळत आहे.