पुणेः कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव झाला. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा कसब्यात मोठा विजय झाला. हा पराभव भाजपने फारच गांभीर्याने घेतल्याचं दिसतंय. आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला असून कसबा निवडणुकीचं पोस्टमार्टम तयार असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या या विधानावरुन भाजप पुण्यामध्ये पक्षांतर्गत कारवाई करणार का? असा प्रश्न उपस्थित होत असून पक्षांतर्गत फेरबदलाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

कसबा पराभवानंतर फडणवीस आज पहिल्यांदाच पुण्यात होते. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, एखादी निवडणूक आपण जिंकतो किंवा हरतो. आम्ही निवडणुकीतल्या विजयानंतर किंवा पराभवानंतर मूल्यमापन करत असतो. याही निवडणुकीचं पोस्टमार्टम केलं आहे. त्यानुसार योग्य ती काळजी घेऊ, असं ते म्हणाले.

अधिक वाचा  जयंत पाटलांना दे धक्का, भाऊच भाजपात; राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत मोठ्या नेत्यांचीही बीजेपीत एंट्री

काय म्हणाले फडणवीस?

एखादी निवडणूक जिंकतो किंवा हरतो, यामुळे फरक पडत नाही

निवडणुकीच्या विजायनंतर किंवा परायजयानंतर मूल्यमापन करत असतो

आम्ही कसबा निवडणूक पराजयाचं पोस्टमार्टम केलं आहे

त्यानुसार योग्य ती काळजी आम्ही घेऊ

हसन मुश्रीफांवर सुरु असलेल्या कारवाईची माहिती नाही

दोन दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस झाला. तात्काळ पंचनाम्याचे आदेश दिले आहेत

शेतकऱ्याने स्वतः फोटोदेखील काढला तरी त्याला आम्ही पंचनामा मानतो

आता विरोधक रात्री पाऊस पडला तरी सकाळी पैसे मागतात

आम्ही अजूनही त्यांच्याच काळातले पैसे देतोय

कसबा विधानसभा पोटनिवडणूक जिंकण्यासाठी भाजपने सर्वोतोपरी प्रयत्न केलं. पक्षाचे शीर्षस्थ नेते आणि खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यात ठाण मांडून होते. शिंदेंनी तर रात्री-अपरात्री प्रचार केला. गल्लीबोळात रॅली निघाल्या. परंतु भाजपला पराभवाचं तोंड बघावं लागले. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसब्यातूनच हेमंत रासने यांचा पराभव झाला. त्यामुळे भाजपला हा पराभव जिव्हारी लागणं स्वाभाविक होतं.

अधिक वाचा  सिंहगड पहिल्या दिवशीच चालकांनी केला चक्काजाम; पालक संतप्त संस्थेकडून थेट सुट्टी जाहीर