नवी दिल्ली : ईशान्य भारतातील त्रिपुरा, नागलँड आणि मेघालय या तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. त्रिपुरा आणि नागालँडमध्ये भाजपयुतीनं पूर्ण बहुमत मिळवलं आहे. तर मेघालयात भाजपचा जुना सहकारी एनपीपी हा पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळं जर भाजपसोबत पुन्हा युती झाली तर मेघालयातही भाजप सत्तेत येऊ शकतं. पण सर्वात मोठी गोष्ट म्हणजे काँग्रेसला या तिन्ही राज्यांमध्ये मोठा फटका बसला आहे.
आरपीआय, राष्ट्रवादीचाही मोठा विजय
दरम्यान, नागालँडमध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अर्थात रिपाइंचे दोन आमदार निवडून आले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसलाही इथं ७ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळं महाराष्ट्रातील चिंचवडची पोटनिवडणूक जरी राष्ट्रवादीनं गमावली असली तरी नागालँडमध्ये चांगला विजय मिळाला आहे.
नागालँडमध्ये महिलांसाठी आजचा मोठा दिवस
नागालँडच्या विधानसभा निवडणुकीत इतिहास रचला गेला आहे. राज्यात पहिल्यांदाच महिला उमेदवारांनी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. यामध्ये दीमापूर तृतीय विधानसभेच्या हेकानी जखालू यांनी विजय मिळवला. हेकानी यांना भाजपा आणि एनडीपीपी युतीनं उमेदवारी दिली होती. तसेच याच युतीची आणखी एक महिला उमेदवार सलहुतुनू क्रुसे यांनीही पश्चिम अंगामी जागेवरुन विजय मिळवला आहे. त्यामुळं महिला आमदार पहिल्यांदाच विधानसभेत दाखल होणार आहेत.
तिन्ही राज्यांत कसं आहे बलाबल?
त्रिपुरा – एकूण जागा ६०
भाजप – ३२
मार्क्सवादी काँग्रेस पार्टी – ११
काँग्रेस – ३
इतर – १४
नागालँड – एकूण जागा ६०
भाजप – १२
काँग्रेस – ७
एनडीपीपी – २५
आरपीआय – २
राष्ट्रवादी काँग्रेस – ७
इतर – १४
मेघालय – एकूण जागा ६०
भाजप – २
काँग्रेस – ५
तृणमूल काँग्रेस – ५
एनपीपी – २६
इतर – २१