वेदांता प्रकल्प परत महाराष्ट्रात आणण्यात मोदींनी मदत केली तर स्वागतच! पण आता गुजरातला गेलेला हा प्रकल्प परत येणं अशक्य असल्याचं वक्तव्य शरद पवार यांनी केलंय. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महराष्ट्रात ऐवजी आता गुजरातमध्ये होणार आहे.
यावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. आरोप- प्रत्यारोपाचं राजाकारण सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. विरोधकांकडून शिंदे सरकाराला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होत आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील याबद्दल नाराजी व्यक्त केलीये. “वेदांतापेक्षाही मोठा प्रकल्प महाराष्ट्रात आणू असं सांगणं म्हणजे बालिशपणाचं” असं मत शरद पवारांनी व्यक्त केलंय.
फॉक्सकॉन वाद, शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेतील 12 मुद्दे
पुणे :फॉक्सकॉन प्रकल्पआता गुजरातमधून पुन्हा महाराष्ट्रात येणं अशक्य आहे, तसं जर पंतप्रधानांनी केलं तर त्याचं स्वागतच आहे असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. यावर आता चर्चा करण्याला कोणताही अर्थ नाही असंही ते म्हणाले. फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यानंतर शरद पवारांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेमधील महत्त्वाचे 12 मुद्दे,
1. फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये जाणं हे दुर्दैवी आहे, यावर त्यापेक्षा आणखी मोठा प्रकल्प आणण्याचं आमिष म्हणजे रडणाऱ्या मुलाची समजूत काढण्यासारखं आहे.
2. फॉक्सकॉन गुजरातमधून परत येणं अशक्य आहे, तसं जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं तर त्यांचं स्वागतच आहे.
3. केंद्राची सत्ता हाती असण्याचे अनुकूल परिणाम काही राज्यांवर होत असतात. त्यामध्ये गुजरात आहे.
4. तळेगावच हेच या प्रकल्पासाठी योग्य होतं. त्याच्या आजूबाजूचा चाकण आणि रांजनगाव हा ऑटोमोबाईलसाठी अनुकूल आहे.
5. यावर आता चर्चा करण्यात काही अर्थ नाही, आता नवीन काही करता येतं का ते पाहावं.
6. एकनाथ शिंदे आणि उदय सामंत हे महाविकास आघाडीमध्ये मंत्री होते. तरीही त्यांनी या प्रकरणी आरोप केले.
7. या आधी महाराष्ट्राच्या नेतृत्वामुळे राज्यात गुंतवणूक यायची आता ती परिस्थिती दिसत नाही.
8. या आधीची परिस्थिती अशी होती की महाराष्ट्र नेहमी गुंतवणूकीच्या बाबतीत एक नंबरला असायचं. काही नेते आणि अधिकारी हे नेहमी गुंतवणूक कशी येईल याकडे लक्ष द्यायचे. आताची परिस्थीती पाहता ते दिसत नाही.
9. सध्याची परिस्थिती पाहता राज्यकर्त्यांचे राज्याकडे लक्ष आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय.
10. आता फक्त काय झाडी, काय डोंगर हे ऐकायला मिळतंय. शिंदे सरकारचा कारभार अजून मला दिसला नाही.
11. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर सगळी केंद्रीय यंत्रणा थंड झाली आहे का असा प्रश्न निर्माण होतोय.
12. राज्याचे प्रमुख गतीनं राज्यभर फिरून ते समजावून घेण्याचा प्रयत्न करत असतील.