दिल्ली : दिल्लीतील मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे आम आदमी सरकार आज विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडणार आहेत. भारतीय जनता पक्ष सरकारवर घोटाळे आणि भ्रष्टाचाराचे आरोप करत आहे. तर आपच्या मंत्र्यांवर खोटे आरोप करुन सरकार आमदार फोडून सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आपकडून करण्यात आला आहे. मात्र भाजप आमचा एकही आमदार फोडू शकली नाही, हेच सिद्ध करण्यासाठी केजरीवाल सरकारने विधानसभेत हा विश्वासदर्शक ठराव मांडला आहे.
केजरीवाल सरकारमधील मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. “ हे ऑपरेशन ‘लोटस’ नसून ऑपरेशन ‘किचड’ असल्याची टीका आपकडून करण्यात येत आहे. पण भाजप ‘आप’चा एकही आमदार फोडू शकला नाही, असे केजरीवाल शुक्रवारी (२६ ऑगस्ट) दिल्ली विधानसभेला संबोधित करताना म्हणाले होते.
मात्र केजरीवाल सरकारचे हे आरोप भाजपाने फेटाळून लावले आहेत. दिल्लीतील अबकारी घोटाळ्याबाबत सीबीआयच्या चौकशीवरुन लक्ष विचलित करण्यासाठी केजरीवाल सरकार हे नाटक करत असल्याचा पलटवार भाजपकडून करण्यात आला आहे. दिल्ली विधानसभेच्या एकूण ७० सदस्यांपैकी ६२ आमदार एकट्या आपचे आहेत. तर उर्वरित आठ आमदार भाजपाचे आहेत.
आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अडचणीत आणण्यासाठी सीबीआयकडून छापेमारी सुरू असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला आहे. तसेच, गुजरात निवडणुकीतून आपने माघार घेतली तर ही छापेमारीही थांबेल, असा दावाही मुख्यमंत्री केजरीवाल यांनी केला आहे. मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानावर छापेमारी करुनही सीबीआयला भ्रष्टाचाराचा एक रुपयाही सापडला नाही. असा खुलासा केजरीवाल यांनी केला आहे.
काही दिवसांपूर्वी ‘आप’चे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्यसभा खासदार संजय सिंह यांनीदेखील भाजपकडून धमकावण्याचे प्रयत्न सुरु असल्याचा खुलासा पत्रकार परिषदेत केला होता. ”आपच्या आमदारांना धमकावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येक आमदारांना २०-२० कोटींची ऑफर दिली जात आहे. २० कोटी घ्या, अन्यथा मनीष सिसोदियांसारखा सीबीआय कारवाईचा सामना करा, अशा धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप सिंह यांनी केला होता.