मुंबई: मुंबई इंडियन्सचे फॅन्स आज पुन्हा एकदा निराश झाले. जसप्रीत बुमराहच्या जबरदस्त कामगिरीवर फलंदाजांनी पाणी फिरवलं. मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांचं कोलकात्याच्या गोलंदाजांसमोर काहीच चाललं नाही. कोलकात्याच्या 166 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईचा डाव 113 धावात आटोपला. केकेआरने मुंबईवर 52 धावांनी मोठा विजय मिळवला. त्यामुळे केकेआरच्या धावगतीत सुद्धा सुधारणा झाली आहे. इशान किशनने (Ishan kishan) 51 धावांची अर्धशतकी खेळी केली. पण त्यात T 20 क्रिकेटला साजेसा वेग नव्हता. त्याने 43 चेंडूंमध्ये 51 धावा केल्या.
मुंबई इंडियन्सला आज अपेक्षित सुरुवात मिळाली नाही. कॅप्टन रोहित शर्मा स्वस्तात बाद झाला. अवघ्या 2 रन्सवर साउदीने रोहितला जॅक्सनकरवी झेलबाद केलं. तिलक वर्माही आज फार वेळ टिकला नाही. त्याला अवघ्या 6 रन्सवर रसेलने बाद केलं. मागचे दोन सामने मुंबई इंडियन्सला जिंकून देणारा टिम डेविड आज चमकला नाही. वरुण चक्रवर्तीच्या फिरकीने त्याला चकवलं. डेविडने 9 चेंडूत 13 धावा केल्या. या खेळीत तीन चौकार होते. पॅट कमिन्सने एकाच ओव्हरमध्ये इशान किशन, डॅनियल सॅम्स आणि मुरुगन अश्विन यांच्या विकेट काढल्या.
पॉइंटस टेबलची स्थिती समजून घ्या
KKR ला आजच्या सामन्यात विजय आवश्यक होता. त्यांच्यासाठी हा सामना ‘करो या मरो’ होता. पॉइंटस टेबलमध्ये केकेआरचा संघ नवव्या स्थानावर होता. आज मुंबई विरुद्धच्या विजयानंतर केकेआरची टीम सातव्या स्थानावर आली आहे. काल चेन्नईने दिल्ली कॅपिटल्सला नमवल्यानंतर केकेआरची नवव्या स्थानावर घसरण झाली होती. प्लेऑफचं आव्हान जिवंत ठेवण्यासाठी केकेआरला आजच्या सामन्यात विजय आवश्यक होता. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना इतर संघांच्या कामगिरीवरही अवलंबून रहावे लागेल. आता दिल्ली, एसआरएच, पंजाब आणि कोलकाता तिन्ही टीम्सचे समान 10 पॉइंटस आहेत.
IPL पॉइंट्स टेबल
लखनौ सुपर जायंट्स 16 (0.703)
गुजरात टायटन्स 16 (0.120)
राजस्थान रॉयल्स 14 (0.326)
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर 14 (-0.115)
दिल्ली कॅपिटल्स 10 (0.150)
सनरायजर्स हैदराबाद 10 (-0.031)
कोलकाता नाइट रायडर्स 10 (-0.057)
पंजाब किंग्स 10 (-0.231)
चेन्नई सुपर किंग्स 8 (0.028)
मुंबई इंडियन्स 4 (-0.894)
KKR च्या धावगतीला बुमराहमुळे ब्रेक
केकेआरने निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 9 बाद 165 धावा केल्या. केकेआरकडून सर्वाधिक वेंकटेश अय्यर 43 आणि नितीश राणाने 43 धावा केल्या. वेकंटेश अय्यरने ज्या पद्धतीची सुरुवात केली होती. ते पाहता केकेआरचा संघ 180-190 धावसंख्या सहज उभारेल असं वाटलं होतं. पण बुमराहच्या वादळापुढे त्यांच्या धावगतीला ब्रेक लागला.