अमरावती: ‘जर हनुमान चालीसा जर या शुभ मुहुर्तावर वाचलं तर महाराष्ट्रावर आलेलं संकट मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून लागलेली साडेसाती ही जर नष्ट करायची असेल तर जिथे शिवसैनिक उभे आहेत मातोश्रीवर त्यांनी सगळ्यांनी हनुमान पठण करावं.’ अशी टीका अपक्ष आमदार रवी राणा यांनी केली आहे.
खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण करू असा इशारा दिल्यानंतर शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले होते. मातोश्री बाहेर शिवसैनिकांची तुफान गर्दी झाली होती. यावेळी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली होती. याचविषयी जेव्हा रवी राणा यांना विचारणा करण्यात आली तेव्हा त्यांनी याबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांवरच टीका केली.
पाहा नेमकी काय टीका केली आमदार रवी राणा यांनी
‘मी प्रार्थना केली आहे की, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सद्बुद्धी देवो. त्यांनी सगळ्या शिवसैनिकांसोबत बसून राज्याच्या समृद्धीसाठी आणि राज्यात जी साडेसाती लागली आहे उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून ती संपविण्यासाठी हनुमान चालीसा त्यांनी मातोश्रीवर वाचली पाहिजे.’
‘त्या ठिकाणी जेवढे शिवसैनिक आहेत त्यांनाही माझं सांगणं आहे की, बाळासाहेबांच्या विचारावर चालून जे दिशाहीन झाले आहेत उद्धव ठाकरे त्यांना दिशा दाखविण्यासाठी बाळासाहेबांच्या विचारावर चालण्यासाठी मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचा. माझा विरोध करुन उपयोग नाहीए.’
‘मी राम आणि हनुमानाचा आशीर्वाद घेऊन मातोश्रीवर येणार आहे. तुम्ही कितीही ताकद लावली तरी श्रीराम आणि बजरंगबलीचा आशीर्वाद माझ्या पाठिशी आहे. मला तिथे येण्यापासून कोणी रोखू शकत नाही.’
‘मला असं वाटतं की, आज जर उद्धव ठाकरेंनी जर त्याठिकाणी हनुमान चालिसा पठण केलं नाही तर मातोश्री जी आहे ती रावणाची लंका होईल. रामाचं जर राज्य पाहिजे असेल, बाळासाहेब असताना ज्या पध्दतीने मातोश्री होती तशीच ठेवायची असेल तर हनुमान चालीसाचं पठण करा.’
‘मला वाटतं शिवसैनिकांनी मला प्रत्युत्तर देण्याची वेळ नाही. महाराष्ट्राच्या समृद्धीसाठी, विकासासाठी, शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी हनुमान चालीसा वाचण्याची गरज आहे.’
‘जर हनुमान चालीसा जर या शुभ मुहुर्तावर वाचलं तर महाराष्ट्रावर आलेलं संकट मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून लागलेली साडेसाती ही जर नष्ट करायची असेल तर जिथे शिवसैनिक उभे आहेत मातोश्रीवर त्यांनी सगळ्यांनी हनुमान पठण करावं.’
‘आज मी हनुमानाला एवढंच साकडं घातलं आहे की, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सद्बुद्धी देवो. मी सकाळपासून भोंगे वाटप केले आहेत. अनेक ठिकाणी मंदिरात ते सुरु देखील झाले आहेत.’ अशा शब्दात रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.