असं म्हणतात की काही नात्यांच्या गाठी या स्वर्गात बांधलेल्या असतात. काही जोड्यांकडे पाहिल्यावर याचा अगदी सहज अंदाज येतो. एकदा का तुमच्या मनात अमूक एका व्यक्तीविषयी प्रेमाची भावना निर्माण झाली की आयुष्य जणू एखाद्या परिकथेप्रमाणे वाटू लागतं. सर्वकाही आपल्यासाठी आणि आपल्या मनाजोगंच घडत आहे, असंच भासतं.
आलिया आणि रणबीर सध्या अशाच अनुभवातून जात असावेत. कारण, अनपेक्षितपणे सुरु झालेलं त्यांचं प्रेम आज लग्नाच्या वळणावर आलं आहे.
आलिया अवघ्या 11 वर्षांची होती, तेव्हा ती पहिल्यांदाच रणबीरला भेटली होती. त्यावेळी तिला त्याच्या खांद्यावर डोकं ठेवायचं होतं पण, ती इतकी लाजरी होती की ते करुच शकली नाही. एका कार्यक्रमादरम्यान तिनं हा प्रसंग सांगितला होता.
इतकंच काय, तर आलिया आणि रणबीरच्या वयात तसं बरंच अंतर. पाहायला गेलं तर हा आकडा मोठा आहे. पण प्रेमात वयाचा आकडा वगैरे सर्वकाही गैरसमज असतात हेच खरं. किमान आलिया आणि रणबीरच्या जोडीकडे पाहून तरी असंच म्हणावंसं वाटतं.
नात्यामध्ये समजुतदारपणा, एकमेकांवरील विश्वास आणि सहाजिकच काळानुरुप आलेली परिपक्वता यांच्या बळावर आलिया आणि रणबीरचं नातं आज या वळणावर आलं आहे.