रात्रीचा लॉकडाऊन करण्याचा राष्ट्रीय स्तरावर विचार सुरू आहे, अशी माहिती अजित पवार यांनी सभागृहात दिली. त्यामुळे रात्रीचा लॉकडाऊन लागणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. देशाचे पंतप्रधानही कोरोना संकटावर गंभीर आहेत. त्यामुळे देशात रात्रीचा लॉकडाऊन लावण्यावर उच्च स्तरावर चर्चा सुरू आहे, असं अजित पवार म्हणाले.

कोरोना संकटातही विधानसभेत बेफिकीर असणाऱ्या सदस्यांना अजित पवार यांनी कानपिचक्या दिल्या. विरोधी पक्षनेते तुम्हालाही विनंती आहे. आपल्या सर्व गोष्टी, व्हिडिओ, ऑडिओ बाहेर जातात. चॅनलला प्रक्षेपण केलं जातं. कितीही कुणी प्रयत्न केला तरी संकट काही संपलेलं नाही. आता अजून एक व्हेरिएंट पुढे आला आहे. त्यामुळे सर्वांनीच काळजी घ्यावी, असं आवाहन अजित पवार यांनी केलं. तर, सभापती नरहरी झिरवाळ यांनी सर्वांनी मास्क लावण्याच्या सूचना केल्या. बोलताना अडचण येत असेल तरच मास्क काढून ठेवा, अन्यथा मास्क लावूनच सभागृहात बसा, अशा सूचना झिरवाळ यांनी दिल्या.

अधिक वाचा  दिलीप वळसे पाटीलांचा अपघात, हात फॅक्चर, खुब्यालाही मार

दरम्यान, मुंबईसह राज्यातील रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. तरी कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचा आलेख घसरताच आहे. या महिन्यात जवळपास ५ दिवस मुंबईत एकाही मृत्यूची नोंद नाही. राज्यात १४ डिसेंबर ते २० डिसेंबरदरम्यान सक्रिय रुग्णसंख्या ९ टक्क्यांनी वाढली.

हा आकडा ७,०९३ पर्यंत केला. यापूर्वीच्या आठवड्यात ही संख्या ६,४८१ एवढी होती. राज्य आजार सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे म्हणतात, रुग्णांमधील ही वाढ अगदी कमी प्रमाणात असून ती शहरापुरती मर्यादित आहे.

मुंबईतील धारावी आणि माहीममध्येही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. गेल्या तीन दिवसात तर माहीममध्ये फक्त १४ रुग्ण आढळून आले आहेत. माहीममध्ये पार पडलेला मेळा आणि चर्चमधील वाढत्या संख्येमुळेही कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.