पुणे : पुणे शहराच्या पाणी पुरवठ्यामध्ये कपात करण्याच्या निर्णय जलसंपदा विभागाने घेतला होता. या निर्णयानंतर पुणेकरांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली होती. या निणर्यामुळे शहरातील भाजप नेत्यांनी तसेच पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी व प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केले होते. पुण्याचे पाणी पळवण्याचा हा डाव असल्याचे देखील मोहोळ म्हणाले होते.
“पाणी कपात करणाऱ्यांना पुणेकर पाणी पाजतील” – फडणवीस
पुणे शहराच्या पाणी कपातीवरून पाण्याच्या या राजकारणात राज्यपातळीवरील नेत्यांनी उडी घेतल्याचे दिसून येत आहे. नुकतेच पुणे दौऱ्यावर आलेल्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पाणी प्रश्नावरून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती. “पुण्याचं पाणी कमी करण्याचा कोणीही प्रयत्न करू नये, जो पुण्याचं पाणी कमी करेल, पुणेकर त्याला पाणी पाजल्याशिवाय राहणार नाहीत.” असे फडणवीस म्हणाले होते.
फडणवीसांच्या टीकेवर जयंत पाटलांचा पलटवार :
पुणे शहर पाणी कपात प्रश्नावर जलसंपदा मंञी जयंत पाटील यांनी खुलासा करत म्हटले आहे कि, पुणे शहराच्या पाणी कपातीचा आमचा कोणताही विचार नाही. उलट फडणवीस सरकारच्याच काळात पुणेकरांची पाणी झाली होती. जलसंपदा मंत्री म्हणून खुलासा करतो कि, राज्य सरकारचा पाणीकपातीबाबत कोणताही विचार नाही. पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना पाटील यांनी हि प्रतिक्रिया दिली आहे.
पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले, काल फडणवीस यांनीच उलट वल्गना केली की, पुणेकरांचं पाणी तोडलं तर पुणेकर सरकारला पाणी पाजल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणूनच आम्ही फक्त त्यांच्या काळात झालेल्या पाणी कपातीची आठवण करून देत आहोत, अशी कोपरखळी जयंत पाटील यांनी फडणवीस यांना काढून सत्तेतून गेल्याची आठवण करून दिली. तसेच भाजपने विनाकारण पुणेकरांना पाणी कपातीवरून भीती दाखवू नये, निवडणूका आल्या असल्याने भाजपाला असे सुचत असल्याचे पाटील म्हणाले.
जलसंपदा विभागाकडून पाणी कपातीस स्थगिती :
काल शुक्रवारी सकाळी पुणे महापालिका आयुक्त व पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांच्यात बैठक होऊन पालिकेच्या पाणी कपातीबाबत पुढील निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.
मात्र, शहरात पाणीकपात केल्यास सद्यस्थितीला शहराच्या सर्व भागात पाणीपुरवठा करणे अशक्य होणार असल्याची माहिती यावेळी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली होती . शहराची वाढती लोकसंख्या व त्याचबरोबर नव्याने समाविष्ट होत असलेल्या २३ गावांचा विचार करता शहरातील पाणी पुरवठ्यात कपात करणे योग्य होणार नसून, पोलीस बंदोबस्तात होणारी पाणी कपात तूर्तास थांबविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पाटबंधारे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.