मुंबई : राज्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना युद्ध सुरु असताना दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देताना नारायण राणे यांना दिलेल्या खात्यावर निशाणा साधला होता. सूक्ष्म आणि लहानमध्ये काय निधी मिळणार आहे? असा टोला अजित पवार यांनी नारायण राणे यांना लगावला होता. त्यावर जन आशिर्वाद यात्रेनिमित्त नारायण राणेंनी सिंधुदूर्गात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अजित पवारांना उत्तर दिले होते. आता अजित पवार यांनी पुन्हा केंद्रीय मंत्री असलेल्या नारायण राणेंना पुन्हा एकदा प्रत्युत्तर दिले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना यावर भाष्य केले आहे. ‘मला या गोष्टीची जास्त चर्चाच करायची नाही. त्यांच त्यांना लखलाभ. आम्हाला आमचं सरकार व्यवस्थितपणे चालवायचं आहे ते आम्ही चालवत आहोत. ते केंद्रात मंत्री आहेत. त्यांनी त्यांच केंद्राचं काम करावं आम्ही आमचं राज्याचं काम करतो,’ असे अजित पवार यांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा  निवडणुकीआधीच भाजपने उधळला गुलाल; 5 उमेदवार बिनविरोध 197 अर्ज त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट

‘सूक्ष्म आणि लहानमध्ये काय निधी मिळणार आहे?. निधी द्यायचं बोललं तर गडकरी साहेबाचं मंत्रालय देऊ शकतं. गडकरी साहेबांनी यापूर्वी निधी दिला आहे. काम पण चालली आहेत. या खात्याचं पूर्वी नाव अवजड खातं होतं. काही लोकं त्याला गंमतीने अवघड खातंही म्हणायचे. आता त्याच्या नावात काही बदल झाले आहेत. आता करोनाचं संकट आल्याने सुक्ष्म आणि लघू खूप सारे उद्योग अडचणीत आले आहेत. देशातील छोट्या उद्योगांसाठी एखादा निर्णय घेत येत असावा, असं वाटतं’, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला होता.

‘अजित पवार अजून अज्ञान आहेत. आपल्या खात्याचं बघा.अजून मी राष्ट्रवादीकडे अद्याप वळलेलो नाही. आपल्यावरील आरोप किंवा केसेस कशा काढायच्या हे अजित पवारांकडून शिकलं पाहिजे.’ ‘माझ्या खात्याला अर्थमंत्र्यांकडून निधी मिळतो. पंतप्रधान योजनांना पंतप्रधान निधी देतात. माझ्याकडे असणाऱ्या योजनांना एकाच वेळी साडे चार लक्ष निधी दिला होता. त्यातील तीन लक्ष कोटी खर्च झाला, अजून एक कोटी २५ लक्ष शिल्लक आहेत. याशिवाय वर्षभरात येणाऱ्या मागण्या पाहतात अर्थखातं पैसे देणार,’ असे उत्तर नारायण राणेंनी दिले होते.