राज्यात राष्ट्रवादीच्या उदयानंतर जातीवाद वाढीस लागल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्यांच्या या आरोपाला आता राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिलेलं आहे. ते आज पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर राज्यात जातीपातीचं राजकारण वाढल्याच्या आरोपावर उत्तर देताना शरद पवारांनी जोरदार टोला लगावला होता. राज ठाकरेंनी त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचे लिखाण वाचावे, असं खरमरीत उत्तर पवारांनी दिलं होतं.आज अजित पवार यांना पुण्यात पत्रकारांनी याच मुद्द्यावरुन प्रश्न विचारला असता त्यांनीही राज ठाकरेंवर त्यांच्या स्टाईलमध्ये निशाणा साधला.

अधिक वाचा  पुणे धरणसाखळीत २८.३९ टीएमसी पाणी; आता ‘टाटा’चा पाण्याचा आधार? उजनी मृतसाठ्याचाही 19TMC वापर

शरद पवारांनी कायमच पुरोगामी विचार मांडले आहेत, हे सगळ्या महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे. कधी तरी काही लोक असं बोलून जातात, मात्र त्याला महत्व देण्याचं करण नाही, अशा शब्दात त्यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं.

हिंदुत्वाच्या राजकारणाला शह देण्यासाठी महाराष्ट्रात जातीचं राजकारण सुरू झालं आहे का?, असा प्रश्न राज ठाकरेंना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना राज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरच महाराष्ट्रात जातीय अस्मितेचा मुद्दा मोठा झाल्याचा आरोप केला होता.

राज्यात आधीपासूनच जाती होत्या. पण जाती अभिमान बाळगण्यापुरत्याच होत्या. पण गेल्या 20 वर्षापासून चित्रं बदललं. लोक जातीचा अभिमान बाळगण्याबरोबरच इतर जातींचा तिरस्कार करू लागले आहेत. हे सर्व राजकीय स्वार्थातून होत आहे. जातीचा मुद्दा हा तर नेत्यांची आयडेंटीटी होत आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात जातीचा मुद्दा सर्वार्थाने मोठा झाला, असं राज म्हणाले होते.

अधिक वाचा  महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप, गोविंदा, करिना कपूर, करिष्मा कपूर शिंदे गटात प्रवेश करणार, काँग्रेसचाही बडा नेता शिवसेनेच्या गळाला