मुंबई: कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत महाराष्ट्राला सर्वाधिक फटका बसला होता. आता केरळसोबत महाराष्ट्रातही परत एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. अॅक्टिव्ह रुग्णांमध्ये महाराष्ट्राचा दुसरा नंबर आहे. विशेष म्हणजे, कोरोनासाठी महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेल्या कोविड टास्‍क फोर्सने राज्‍यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे.

मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्ससोबत बैठक

कोविड टास्‍क फोर्सने सांगितल्यानुसार, सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते. काही दिवसांपूर्वीच मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोविड टास्‍क फोर्ससोबत महत्वाची बैठक घेतली होती. यात कोरोनाची तिसरी लाट येण्याच्या शक्यतेसह आरोग्य सुविधा, ऑक्‍सिजनची उपलब्धता आणि कोरोनाला रोखण्यासाठी योग्य उपाययोजना, यावर चर्चा झाली.

अधिक वाचा  नवनीत राणांचा प्रचार करणार नाही, तर पराभव करणार; बच्चू कडू यांचा कडाडून विरोध

महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यू
कोरोना सुरु झाल्यापासून आतापर्यंत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात होते. सरकारी आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात आतापर्यंत 63 लाखांपेक्षा जास्त लोकांना कोरोना झाला, तर 1.34 लाखांपेक्षा जास्त मृत्यू झाले. विशेष म्हणजे, राज्‍यात आतापर्यंत 61 लाखांपेक्षा जास्त रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मंगळवारी(दि.10) राज्‍यात 137 मृत्यू आणि 5,609 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.