नवी दिल्ली- कर्नाटकमध्ये पुन्हा एकदा नेतृत्व बदलाच्या चर्चांना उधाण आलं आहे. नेतृत्व बदलाच्या चर्चेनंतर राज्याचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी मागील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचा इतर ज्येष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. त्यामुळे त्यांचे पद जाणं निश्चित मानलं जातंय. सूत्रांच्या माहितीनुसार कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा केव्हाही आपला राजीनामा देऊ शकतात. येडियुरप्पा यांनी ट्विट करत विरोधी निदर्शने न करण्याचं आवाहन केलं आहे. याद्वारे त्यांनी पक्षाला संदेश देण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.
येडियुरप्पा यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, मला अभिमान आहे की मी भाजपचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे. माझ्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे की, ‘मी पक्षाच्या आदेशांचे पालन करत भाजपची सेवा केली आहे. मी सर्वांना आग्रह करतो की, त्यांनी पक्षाच्या संस्कृतीचे पालन करावे आणि कसल्याही विरोधी निदर्शनांमध्ये भाग घेऊ नये. पक्षाची प्रतिमा खराब होईल असं कसलेही कृत्य करु नये’. येडियुरप्पा यांच्या ट्विटमुळे त्यांच्या राजीनाम्याच्या चर्चांनी वेग घेतला आहे.
नेतृत्व बदलाच्या चर्चा असताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी भारतीय जनता पक्षाच्या आमदारांसाठी देण्यात येणारे रात्रभोजन स्थगित केले आहे. येडियुरप्पा सरकारला दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 25 जुलैला आमदारांना रात्रभोजन दिले जाणार होते. अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार रात्रभोजन स्थगित करण्याचे कारण सांगण्यात आले नाही, तसेच पुढची तारीखही देण्यात आली नाही. रविवारी सात वाजता रात्रभोजन शहरातील एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते.
26 जुलैला कर्नाटक सरकारला दोन वर्षे होणार पूर्ण
येत्या 26 जुलैला सरकारचे दोन वर्ष पूर्ण करणारे येडियुरप्पा मागील आठवड्यात दिल्ली दौऱ्यावर गेले होते. यादरम्यान, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली होती. त्यांच्या या दिल्लीवारीमुळे नेतृत्व बदलाच्या चर्चा रंगल्या. दिल्लीवरुन परत आल्यानंतर येडियुरप्पा यांनी या शक्यता फेटाळून लावल्या होत्या.