नवी दिल्ली- देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या स्थिर आहे. गेल्या 24 तासांत देशात 41 हजार 383 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तर 38 हजार 652 रुग्णांनी विषाणूवर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशात बुधवारी 507 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. गेल्या काही दिवसांपासून देशात रुग्णसंख्या 50 हजारांच्या आत नोंदली जात आहे. आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भातील माहिती दिली आहे.
देशात आतापर्यंत एकूण 3 कोटी 12 लाख 57 हजार 720 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर 3 कोटी 04 लाख 29 हजार 339 रुग्ण विषाणूच्या संसर्गातून बरे झाले आहेत. देशात आतापर्यंत 4 लाख 18 हजार 987 रुग्णांना विषाणूच्या बाधेमुळे जीव गमवावा लागला आहे. देशातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याचे चित्र आहे. देशात सध्या कोरोनाचे 4 लाख 09 हजार 394 सक्रिय रुग्ण आहेत.
कोरोना विषाणूला हरवायचं असेल तर लसीकरण हाच एकमेव प्रभावी मार्ग आहे. त्यामुळे देशात 16 जानेवारीपासून लसीकरण मोहिम हाती घेण्यात आली. आतापर्यंत देशातील 41 कोटी 78 लाख 51 हजार 151 नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लशीचा किमान एक डोस मिळाला आहे. बुधवारी 20 लाखांपेक्षा अधिक लोकांनी विषाणू प्रतिबंधक लस घेतली. गेल्या 24 तासांत 17 लाख 18 हजार 439 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली. आतापर्यंत 45 कोटी 09 लाख 11 हजार 712 रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात आलीये. आयसीएमआरने यासंदर्भातील माहिती दिली.
महाराष्ट्रातील कोरोना आकडेवाडी
दिवसभरात राज्यात ८ हजार १५९ नव्या रुग्णांची नोंद झाली तर ७ हजार ८३९ रुग्ण बरे झाले. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात दिवसभरात १६५ रुग्णांचा मृत्यू झालाय. एकूण मृत्यूंची संख्या १ लाख ३० हजार ९१८ झाली आहे. आतापर्यंत ६० लाख ०८ हजार ७५० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय. राज्यात सध्या ९४,७४५ सक्रिय रुग्ण आहेत.