मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांची 10 जनपथची भेट बातमीचा मोठा विषय झाली आहे. या नेत्याकडे काँग्रेस मोठी जबाबदारी सोपवण्याची शक्यता आहे. सोनिया गांधी यांच्याशी झालेल्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याबद्दल कमलनाथ किंवा काँग्रेसतर्फे अधिकृतरीत्या काही सांगण्यात आलेलं नसलं तरी कमलनाथ काँग्रेसचे अध्यक्ष होऊ शकतात, अशी कुजबुज सुरू आहे. तसं झालं तर गांधी परिवाराच्या आतल्या गोटातला खास विश्वासू नेता पक्षाच्या सर्वोच्च स्थानी असेल.
एके काळी कमलनाथ दिवंतगत नेते संजय गांधींच्या आणि पर्यायाने गांधी परिवाराच्या एवढ्या जवळ होते की, इंदिरा गांधी यांचा मानलेला मुलगा किंवा राजीव आणि संजय यांच्यासारखा तिसरा मुलगा असं त्यांना ओळखलं जाईल.
संजय गांधी आणि नंतर राजीव गांधी सत्तेत असेपर्यंत कमलनाथ यांचं सरकारमध्ये मोठा दबदबा होता. पुढे अनेक वर्ष सत्तेतून बाहेर राहिल्यानंतर 72 वर्षांचे कमलनाथ पुन्हा एकदा मुख्य प्रवाहात आले . 15 वर्षांचा वनवास संपवून त्यांनी काँग्रेसल मध्य प्रदेशात सत्ता मिळवून दिली. राज्यांचे मुख्यमंत्री म्हणून ते विराजमान झाले. पण मध्य प्रदेशात ऑपरेशन लोटसच्या झंझावातात त्यांना पाच वर्ष पुरी व्हायच्या आधीच मुख्यमंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागली. काँग्रेसची सत्ता गेली आणि कमलनाथ यांची जादू ओसरल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली.
गांधी घराण्याशी एकनिष्ठ असणाऱ्या कमलनाथ यांची राहुल गांधी यांनी मध्य प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. त्यानंतर त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकून काँग्रेसला राज्यात पुन्हा उभारी मिळवून दिली.
संजय गांधींचे जिगरी दोस्त
कानपूरला संपन्न परिवारात त्यांचा जन्म झाला. कमलनाथ यांचे शिक्षण जगप्रसिद्ध डुन स्कूलमध्ये झालं. तिथेच त्यांची संजय गांधी यांच्याशी ओळख झाली. पुढे ते जिगरी दोस्त झाले. त्यांची ही मैत्री एवढी घट्ट होती की इंदिरा गांधी या कमलनाथ यांना आपला तिसरा मुलगाच मानत होत्या. संजय गांधी एवढच त्यांचं कमलनाथ यांच्यावरही प्रेम होतं. त्यावेळी एक घोषणा प्रसिद्ध होती, ‘इंदिरा गांधी एक दो हाथ एक संजय और एक कमलनाथ’
वयाच्या 22 व्या वर्षी त्यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर संजय गांधी यांच्यासोबत कामाला सुरूवात केली. संजय गांधी ब्रिगेड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गटाचे ते सक्रिय सदस्य होते.कमलनाथ यांच्याबाबत एक गोष्ट सांगितली जाते की गेल्या 30 वर्षात त्यांच्यातल्या च्युइंगम खाणं, दुर्मिळ आगपेट्या जमविणं आणि गांधी घराण्याप्रती निष्ठा या तीन गोष्टी कधीच बदलल्या नाहीत.
आणीबाणीतही साथ
1975 मध्ये आणिबाणि लादल्यानंतरही त्यांनी कमलनाथ यांनी संजय गांधी यांची कधीच साथ सोडली नाही. आणीबाणीचे कट्टर समर्थक होते. त्यावेळच्या सर्व वादग्रस्त उपक्रमात त्यांनी संजय गांधींची मदत केली. 1977 मध्ये जेव्हा देशात जनता पक्षाचं सरकार आलं त्यानंतर संजय गांधी यांना जेलमध्ये जावं लागलं.
तेव्हा इंदिरा गांधी या संजय यांच्या सुरक्षेबाबत चिंताग्रस्त होत्या तेव्हा कमलनाथ यांनी नाट्यमय पद्धतीनं तिहारमध्ये प्रवेश मिळवला आणि संजय गांधींची सोबत केली.
तिहारमध्ये नाट्यमय प्रवेश
तिहारमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी त्यांनी वकिलामार्फत एक योजना तयार केली. एका प्रकरणात कोर्टात गेले असताना त्यांनी न्यायाधिशांवर कागदाचे बोळे फेकून मारले. तरीही न्यायाधीश शिक्षा देत नाहीत असं दिसल्यावर त्यांनी जोरजोरात ओरडायला सुरुवात केली. शेवटी न्यायाधीशांनी त्यांना 500 रुपये दंड ठोठावला. तेव्हा त्यांनी दंड भरायला नकार दिला आणि त्यांची रवानगी जेलमध्ये झाली.
नंतरच्या काळात ते केंद्रात मंत्री झाले. राजीव गांधींसोबतही त्यांची मैत्री होती. नंतर सोनिया गांधी आणि आता राहुल गांधी यांच्याशीही त्यांनी चांगलं जमवून घेतलं आणि आता त्याचं त्यांना फळही मिळालं.