मुंबई : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत महाराष्ट्राने पुन्हा एकदा आतापर्यंतची विक्रमी उच्चांकी कामगिरी आज नोंदविली. रात्री आठपर्यंत दिवसभरात 7 लाख 96 हजार 738 नागरिकांचे लसीकरण करून नवा विक्रम केला. अंतिम आकडेवारी येईपर्यंत लसीकरणाची संख्या 8 लाखांवर जाईल. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणावर लस देण्याची आतापर्यंतची ही सर्वोच्च आकडेवारी आहे. राज्यात आतापर्यंत 3 कोटी 38 लाख 57 हजार 372 लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत, असे आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.
लसीकरणामध्ये राज्याने केलेल्या विक्रमी कामगिरीची नोंद घेत लक्षणीय कामगिरी करणाऱ्या आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कौतुक केले आहे.
गेल्या तीन महिन्यात लसीकरण मोहिमेमध्ये देशात महाराष्ट्राची कामगिरी विक्रमी राहीली आहे. प्रत्येक दिवशी आधीच्या विक्रमी कामगिरीपेक्षा सरस कामाची नोंद होत आहे. रात्री उशिरापर्यंतची आकडेवारी येईपर्यंत दिवसभरात 8 लाख नागरीकांचे लसीकरणाची विक्रमी नोंद महाराष्ट्राच्या नावाने नोंदविली जाईल, असे डॉ. व्यास यांनी सांगितले. यापूर्वी 26 जून रोजी 7 लाख 38 हजार 704 नागरिकांचे एकाच दिवशी लसीकरण करण्यात आले होते.
कोरोना लस गर्भवतीही घेऊ शकणार
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण करणे खूप महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत एक चांगली बातमी समोर आली आहे. आता गर्भवती महिलादेखील कोरोनाची लस घेऊ शकतात. आरोग्य मंत्रालयाने गर्भवती महिलांना लस देण्याच्या नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप ऑफ इम्यूनायजेशनच्या (NTAGI) प्रस्तावाला मंजुरी दिली आहे
आरोग्य मंत्रालयाच्या मंजुरीनंतर आता कोणतीही गर्भवती महिला कोव्हिन अॅपवर लसीकरणासाठी नोंदणी करू शकते, किंवा जवळच्या लसीकरण केंद्रावर थेट जाऊन लस देखील घेऊ शकते. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गर्भवती महिला गरोदरपणाच्या कोणत्याही टप्प्यावर लस घेऊ शकतात. गर्भवती महिलांना लस देण्यासाठी परिचालन मार्गदर्शक सूचना (ऑपरेशनल गाइडलाइन) जारी करण्यात आली आहे. यामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांना आणि FLWs साठी समुपदेशन किट आणि सामान्य लोकांना दिले जाणारे IEC साहित्य सर्व राज्यांना पुरविण्यात आले आहे.
इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) नुकताच एक अभ्यास जाहीर केला आहे. त्यानुसार, कोरोना विषाणूच्या दुसर्या लाटेचा गर्भवती महिला आणि नुकतीच प्रसुती झालेल्या मातांवर अधिक परिणाम दिसून आला आहे. गंभीर लक्षणे आणि मृत्यूची प्रकरणे देखील या लाटेत जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे.