करोनाला नियंत्रणात आणण्यासाठी देशात लावण्यात आलेले कठोर निर्बंध ३० जूनपर्यंत कायम राहणार आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी निर्बंध गरजेचं असल्याचं गृहमंत्रालयाने सांगितलं आहे. निर्बंधांची कठोर अंमलबजावणी केली असल्याने अनेक राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये नवे तसंच अॅक्टिव्ह रुग्णसंख्या कमी झाली असल्याचं केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी म्हटलं आहे.

“रुग्णसंख्या कमी होत असली तरी अॅक्टिव्ह रुग्णसंख्या अद्यापही जास्त असल्याचं मला नमूद करायचं आहे. यामुळे करोना नियंत्रणात ठेवण्यासाठी निर्बंधांची कठोरपणे अंमलबजावणी केली जाऊ शकते. दरम्यान स्थानिक परिस्थिती, गरजा आणि संसाधनांचा आढावा घेतल्यानंतर राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेऊ शकतात,” असं आदेशात सांगण्यात आलं आहे.

अधिक वाचा  राजकीय पक्षांच्या खर्च नियंत्रणाची सर्व नियमावली ठरली; प्रचारक माणसांचा ‘रेट’ नाश्ता जेवण मंडप होर्डिंगचे हे दर

गृहसचिवांनी राज्यांनी करोना रुग्णसंख्या कमी करण्यासाठी धोरणं आखण्यास सांगितलं आहे. याआधी २९ एप्रिलच्या आदेशात गृहमंत्रालयाने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना जास्त रुग्णसंख्या असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये स्थानिक पातळीवर कठोर निर्बंध लावण्याची सूचना केली होती. गेल्या एक आठवड्यात पॉझिटिव्हिटी रेट १० टक्क्यांपेक्षा जास्त असणाऱ्या जिल्ह्यांची माहिती घ्या असंही यावेळी सांगण्यात आलं होतं.

दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने परिस्थितीचा आढावा घेऊन राज्यांनी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार निर्बंध लागू करावेत असं सांगितलं आहे.

दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने परिस्थितीचा आढावा घेऊन त्वरित अंमलबजावणीसाठी प्रसिद्ध करण्यात केलेल्या मार्गदर्शक तत्वांप्रमाणे राज्यांना कठोर निर्बंध लागू करण्यासंबंधी विचार करण्यास सांगितलं आहे. याआधी आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी देशातील करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचं सांगताना अॅक्टिव्ह रुग्णसंख्या मात्र अद्यापही खूप जास्त असल्याकडे लक्ष वेधलं होतं.