मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे वादात सापडलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर आज(सोमवार) मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला चौकशीचे आदेश दिल्यानंतर गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला. मात्र, आता या प्रकरणी त्यांच्याविरोधातील सीबीआय चौकशीचा आदेश रद्द करण्यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतल्याचे समोर येत आहे.

परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश सीबीआयला दिले आहेत. तसेच, न्यायालयाने १५ दिवसांत चौकशी पूर्ण करण्याचाही आदेश सीबीआयला दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयात परमबीर सिंह यांच्यासोबत वकील जयश्री पाटील यांनी देखील याचिका केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांच्यासहित दाखल इतर दोन जनहित याचिका फेटाळून लावत वकील जयश्री पाटील यांच्या याचिकेवर हे आदेश दिले आहेत.

अधिक वाचा  ठाकरे गटाची लोकसभेच्या 17 उमेदवारांची यादी जाहीर, कुणा-कुणाला संधी?

तर, आता याप्रकरणी अनिल देशमुख हे स्वतंत्रपणे सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं समोर येत आहे. एकूणच मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात लवकरच सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाणार आहे. विशेष, गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंत अनिल देशमुख हे नागपूरला जातील, असं वाटत होतं. मात्र ते थेट दिल्लीला रवाना झाल्याचं समोर आलं आहे. दिल्लीत ते काही मोठ्या व्यक्तींच्या गाठीभेटी घेणार असल्याचंही बोललं जात आहे.