मुंबई: मुंबईतील नागरिकांना विविध नागरी सेवा सुविधा सातत्याने देणारी मुंबई महानगरपालिका आपल्या क्षेत्रातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी देखील नियमितपणे घेत असते. मुंबई महानगरपालिकेच्या या आरोग्यविषयक कार्यकर्तृत्वाचा गौरव देशाच्या राजधानीत म्हणजेच दिल्लीमध्ये करण्यात आला. यासाठी निमित्त ठरले ते राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण विषयक पुरस्कारांचे…

केंद्र सरकारद्वारे क्षयरोग नियंत्रण विषयक कार्यकर्तृत्व लक्षात घेऊन दरवर्षी राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येतात. बुधवारी संध्याकाळी दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांच्या हस्ते आणि देशभरातील मान्यवरांच्या उपस्थितीत चार पुरस्कारांनी मुंबई महानगरपालिकेचा सन्मान करण्यात आला. यामध्ये एक रजत व तीन कांस्य पदकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे मुंबई महानगरपालिकेला एकाच वेळी तब्बल चार पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्राचे हे क्षयरोग मुक्तीच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे, असे यानिमित्ताने बोलले जात आहे.

अधिक वाचा  बाबासाहेबांच्या भव्यदिव्य मिरवणुकीवर शिवडी विभागात ठिकठिकाणी फुलांच्या वर्षांवाने स्वागत

महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांनी महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याचे व संबंधित सर्व चमूचे या पुरस्कारांसाठी अभिनंदन केले आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात प्रशासकीय दृष्ट्या मुंबई शहर जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हा असे दोन जिल्हे असले तरी क्षयरोग नियंत्रणाच्या दृष्टीने मुंबई महानगरपालिका क्षेत्रात २४ क्षयरोग जिल्ह्यांची (TB District) रचना आहे.

या रचनेनुसार मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील परळ क्षयरोग जिल्ह्यास रजत पदकाने गौरविण्यात आले आहे तर घाटकोपर, ग्रँट रोड व प्रभादेवी या तीन जिल्ह्यांना कांस्य पदकाने गौरविण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने शहर क्षयरोग अधिकारी डॉक्टर प्रणिता टिपरे आणि राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आलेल्या ४ क्षयरोग जिल्ह्यांचे ‘जिल्हा क्षयरोग अधिकारी’ डॉक्टर नरेंद्र सुतार, डॉक्टर मेघा बासेकर, डॉक्टर रुपाली हिरे आणि डॉक्टर रचना विश्वजीत यांनी हे पुरस्कार स्वीकारले. याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे क्षयरोग अधिकारी डॉक्टर रामजी अडकीकर हे देखील उपस्थित होते.