मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार स्थिर आहे. या सरकारला कोणताही धोका नाही. उलट हे सरकार पडणार असं म्हणणारे हे अंजान अॅस्ट्रोलॉजर्स आहेत, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केली.

प्रफुल्ल पटेल यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही टीका केली. सरकार पडणार हे म्हणणारे अंजान अॅस्ट्रोलॉजर्स सारखे आहेत. कोविड येणार हे त्यांना माहिती नव्हते. ऑपरेशन लोटस होणार नाही, पण रिवर्स ऑपरेशन होऊ शकते, असा दावाही पटेल यांनी केला. यावेळी त्यांनी

पार्थ पवार प्रकरणावरही भाष्य केलं. शरद पवार विरुद्ध अजित पवार असा काही विषयच नाही. पार्थ विषय ही काही मोठा नाही आणि कुठलाच वाद नाही, असा दावाही त्यांनी केला. मी स्वत: पवार कुटुंबीयांना भेटलो. त्यांच्याशी चर्चा केली. हा काही मोठा राजकीय विषय नाही. तरीही त्याला अवाजवी महत्त्व दिलं जात आहे. उगाच चर्चा सुरू आहेत, असंही ते म्हणाले.

अधिक वाचा  बाबासाहेबांच्या भव्यदिव्य मिरवणुकीवर शिवडी विभागात ठिकठिकाणी फुलांच्या वर्षांवाने स्वागत

पूर्वी काँग्रेस पक्ष मोठा होता. आता राष्ट्रवादी पक्ष मोठा झाला आहे. शरद पवार हे सर्वात मोठे नेते आहेत. त्याला आम्ही काय करू शकतो, असा चिमटा त्यांनी काँग्रेसच्या नाराजीच्या प्रश्नावर काढला. चर्चेतून कामं होत आहेत, असंही ते म्हणाले.

विदर्भात महानगर पालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. यावेळी काँग्रेसने राष्ट्रवादीलाही जागा सोडल्या पाहिजेत, असंही ते म्हणाले. नागपुरातील मिहान प्रोजेक्टमध्ये माझा महत्वाचा रोल होता. राज्यात भाजपचा मुख्यमंत्री झाला. केंद्रात मंत्री आहेत. तरीही हा प्रकल्प पुढे गेला नाही. मला कोणावर आरोप करायचा नाही, असा टोलाही त्यांनी हाणला.

अधिक वाचा  बाबासाहेब आंबेडकर स्वत: आले तरी संविधान बदललं जाणार नाही; नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसला जवाब

दरम्यान, सुशांतसिंह आत्महत्याप्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करावी, अशी मागणी पार्थ यांनी केली होती. तसं पत्रंही त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिलं होतं. त्यावर वाद निर्माण झाल्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ यांच्या बोलण्याला काडीचीही किंमत देत नसल्याचं वक्तव्य केलं होतं. पार्थचा अनुभव कमी आहे. तो प्रगल्भ नाही. त्यामुळे माझ्या नातवाच्या बोलण्याला मी कवडीचीही किंमत देत नाही, असं पवार म्हणाले. तसेच कुणाला सुशांत प्रकरणाची सीबीआय चौकशी करायची असेल तर आमचं काही म्हणणं नाही.

कुणाला सीबीआय चौकशीची गरज वाटत असेल तर त्याला विरोध असण्याचं कारणही नाही. मात्र, महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलिसांवर आमचा पूर्ण विश्वास आहे, असंही त्यांनी सांगितलं होतं. एखाद्याने आत्महत्या केली तर त्यावर दु:ख होते. पण या प्रकरणाची ज्या पद्धतीने चर्चा सुरू आहे, त्याचं आश्चर्य वाटतं, असं सांगतानाच या प्रकरणात कुणी कुणावर काय आरोप केले या खोलात जायचं नसल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.