केरळ विमान दुर्घटनेत १४ प्रवाशांचा मृत्यू झाला. तर १२३ जण जखमी झाले आहेत. केरळच्या कोझिकोड या ठिकाणी असलेल्या विमानतळावर रात्री ८ च्या सुमारास एअर इंडियाचं एक विमान लँड झालं. विमान धावपट्टीवर असतानाच हे विमान घसरलं आणि छोट्या दरीत पडलं. या भीषण अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला. १२३ जण जखमी झाले आहेत. तर १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्घटना घडताच तातडीने त्या ठिकाणी अग्निशमन दलाचे जवान, रुग्णवाहिका यांच्यासह मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आलं. आता या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
कोण कोण होतं विमानात?
१७४ प्रवासी
१०-तान्ही बाळं
२- वैमानिक
४ केबिन क्रू
विमान अपघाताबाबत एअर इंडियाचं पत्रक
एअर इंडिया एक्स्प्रेस फ्लाइट IX 1344 हे दुबईहून केरळच्या कोझिकोड या ठिकाणी आलं होतं. या विमानाचा धावपट्टीवर अपघात झाला आहे. या विमानात १७४ प्रवासी, १० लहान मुलं, दोन वैमानिक आणि चार केबिन क्रू मेंबर होते. सध्या या ठिकाणी मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याबाबतची माहिती आम्ही वेळोवेळी देऊ असंही एअर इंडियाने म्हटलं आहे.
सदर घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रपती रामनाथ कोविंद या सगळ्यांनी ट्विट करुन शोक व्यक्त केला आहे. केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन केला होता. फोनवर त्यांनी या अपघाताबाबतची विचारपूस केली. सध्याच्या घडीला काय परिस्थिती आहे ते जाणून घेतलं.