राज जन्मभूमी आंदोलनाच्या गेल्या काही दशकांध्ये अनेक नेत्यांनी आपलं योगदान दिलं आहे. या नेत्यांच्या कामामुळेच हे आंदोलन आकाराला येऊ शकलं.
महंत परमहंस रामचंद्र दास – राम मंदिर आंदोलनातले ते प्रमुख संत होते आणि श्री राम जन्मभूमी न्यासाचे ते दीर्घकाळ अध्यक्षही होते. 1949पासून आंदोलनात सहभागी होता. चळवळीला पुढे नेण्यात त्यांनी मोठं योगदान दिलं. 2003मध्ये त्यांचं निधन झालं.
अशोक सिंघल – राम मंदिराचं आंदोलन शिखरावर नेण्यास अशोक सिंघल यांचं सर्वात मोठं योगदान आहे. विश्व हिंदू परिषदेचे दीर्घकाळ अध्यक्ष राहिलेल्या सिंघल यांनी गावपातळीपर्यंत आंदोलन येऊन त्याला व्यापक पाठिंबा मिळवला होता. समाजातल्या विविध घटकांचं समर्थनही त्यांनी आंदोलनाला मिळवलं. 2015मध्ये वयाच्या 89व्या वर्षी त्यांचं निधन झालं.
लालकृष्ण अडवाणी- भाजपचे तत्कालीन अध्यक्ष लालकृष्ण अडवाणी यांनी 25 सप्टेंबर 1990ला गुजरातमधल्या सोमनाथ येथून रथयात्रेची सुरुवात केली. राम मंदिर आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी या रथात्रेचं आयोजन होतं. सगळा देश त्यामुळे ढवळून निघाला. बिहारमध्ये त्यावेळी मुख्यमंत्री असलेले लालू प्रसाद यादव यांनी रथयात्रा अडवून अडवाणींना अटक केली होती.
मोरोपंत पिंगळे – राम मंदिर आंदोलनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते असलेल्या पिंगळे यांनी पडद्यामागे महत्त्वाची भूमिका निभावली. आंदोलनाची रुपरेषा तयार करणं, त्याला वैचारिक बैठक देणं आणि संघाच्या स्वयंसेवकाची फळी आंदोलनामागे उभी करण्याचं काम त्यांनी केलं.
मुरली मनोहर जोशी – भाजपचे अध्यक्ष असतांना जोशी यांनी राम मंदिर आंदोलनात मोठं योगदान दिली. देशभरातल्या बुद्धिवंतांचा पाठिंबा मिळवणं आणि आंदोलनाला वैचारिक मार्गदर्शन करण्याचं काम त्यांनी केलं.
साध्वी ऋतुंभरा – विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या असलेल्या साध्वी ऋतुंभरा आणि उमा भारती यांनी आपल्या आक्रमक भाषणांनी वादळ निर्माण केलं होतं. अत्यंत जहाल भाषणांनी त्यांनी सगळं आंदोलन ढवळून काढलं. आपल्या वक्तव्यांनी त्यांनी अनेक वादही निर्माण केले होते.
गोविंदाचार्य – कधीकाळी भाजपचे चाणक्य समजले जाणारे गोविंदाचार्य यांनी राम मंदिर आंदोलनाच्या काळात भाजप आणि संघ परिवारातील संस्थांमध्ये समन्वयाचं काम केलं. भाजपकडून राम मंदिर चळवळीविषयी त्यांनी व्यापक पाठिंबा मिळवला.
कल्याण सिंग – उत्तर प्रदेशचे त्यावेळी मुख्यमंत्री असलेले कल्याण सिंग यांनी कारसेवकांना अयोध्येत जमण्याची परवानगी दिली होती. 6 डिसेंबर 1992 ला अयोध्येत वादग्रस्त बाबरी मशिद पाडण्यात आली आणि आंदलनाने नवं वळ घेतलं. कल्याण सिंग यांनीच कारसेवकांना रोखलं नाही असा आरोप केला जातो.
के परासरन – 93 वर्षांचे माजी अटर्नी जनरल असलेले के परासरन हे निष्णात वकिल म्हणून ओळखले जातात. न्यायालयात राम जन्मभूमी आणि इतर संघटनांची बाजू त्यांनी भक्कपणे लढवली. राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टमध्येही त्यांची नियुक्ती सरकारने केली आहे.
चंपत राय – राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे प्रवक्ते असलेले चंपत राय यांचं नाव सध्या चर्चेत असतं. विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय महासचिव असलेल्या चंपत राय यांनी पडद्यामागे राहून मोठी कामगिरी बजावली आहे. 1984 पासून त्यांनी न्यायालयीन लढाईसाठी कागदपत्र गोळा करणं आणि पुरावे गोळा करण्यासाठी अविश्रांत मेहनत घेतल्याचं सांगितलं जातं.