नगर: ‘राम मंदिर बाबत सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे. त्याला विरोध करण्याचा प्रश्नच उठत नाही. उलट कोविड साथ कमी झाल्यानंतर राम मंदिर निर्माण कार्यात अनेक लोक सहभागी होतील. पण आज प्राथमिकता कोविडची असून त्याकडे लक्ष द्यावे,’ असे वक्तव्य करीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी राम मंदिर केलेल्या वक्तव्याचा समर्थन केले.

आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात दक्षिण जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक पाटील यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार संग्राम जगताप , निलेश लंके, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते आदी उपस्थित होते. या बैठकीनंतर पाटील पत्रकारांशी बोलत होते.

अधिक वाचा  गळीत हंगामाला साडेचार महिनेच पूर्ण राज्यातील १२० कारखान्यांचा हंगाम बंद; अद्यापही ८७ ठिकाणी हंगाम सुरू

‘कोविड चे संकट सध्या चालू आहे. त्यामधून बाहेर येण्यासाठी काय करता येईल, याला जगात प्राधान्य आहे. सध्या लोकांच्या लक्षात आले आहे की, सर्व प्रार्थनास्थळे बंद आहेत. आपली आशा डॉक्टरवर आहे. कोविड सोबत आपला देश कसा लढतो, याकडे देशाचे लक्ष आहे.

राम मंदिर बाबत सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे. त्याला विरोध करण्याचा प्रश्नच उठत नाही. उलट राम मंदिराच्या निर्माण मध्ये अनेक लोक सहभागी होतील . पण आज प्राथमिकता कोविडची असून त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. पंतप्रधानांपासून ग्रामपंचायत सरपंच यासर्वांनी कोविड कसा कमी करता येईल, हे पाहणे गरजेचे आहे. राम मंदिर करायचे आहे. कोविड कमी झाला, तर सर्वच भक्त आपण राम मंदिराच्या निर्माण मध्ये लागू, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

अधिक वाचा  छत्रपती शिवाजी महाराज जंयती नाचुन नाही वाचुन मोरया मित्र मंडळाचा वेगळा स्तुत्य उपक्रम

भाजप नेत्यांवर टीकास्त्र
पाटील यांनी यावेळी राज्यातील भाजप नेत्यांच्याही समाचार घेतला. सरकार बद्दल राज्यात गैरसमज पसरवण्याचे प्रयत्न चालू आहेत. सरकार काही काम करीत नाही, असे दाखविण्यासाठी काही शक्ती प्रयत्नशील आहेत. पण महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. कोविड कमी करण्यासाठी राज्य सरकार याबाबत सर्वते प्रयत्न करीत असून लोकांचे जीव वाचवण्यास प्राधान्य देत आहे.

आज हजारोच्या संख्येने आपण कोविड टेस्ट करतोय. देशात सर्वात जास्त टेस्ट आपल्याच राज्यात केल्या जात आहेत. त्यामुळे राज्याचे विरोधी पक्षनेते यांचा आक्षेप खरा नाही. आम्ही केंद्र सरकारवर टीका करत नाही. कारण ही वेळ टीका करण्याची नाही, तर सहकार्य करण्याची आहे. हे राज्यातील भाजप नेत्यांनीही लक्षात ठेवावे,’ असेही ते म्हणाले.