मुंबई: भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी बुधवारी दिल्लीत राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. यावेळी घडलेल्या एका प्रकारामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. उदयनराजे यांनी शपथ घेतल्यानंतर ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी’ अशी घोषणा दिली. मात्र, राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी त्यावर आक्षेप घेत उदयनराजे भोसले यांना समज दिली.

यानंतर आता राज्यातील काँग्रेसचे नेते आक्रमक झाले आहेत. भाजपला शिवाजी महाराज केवळ निवडणुकांपुरते हवे असतात, अशी टीका काँग्रेस नेते भाई जगताप यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराज आणि आई भवानीचे नाव घेतलेले तुम्हाला चालणार नाही? तुमचं शिवाजी महाराजांबद्दलचं प्रेम बेगडी आहे, हे आम्हाला माहिती आहे. शिवाजी महाराज तुम्हाला केवळ निवडणुकांपुरतेच हवे असतात. व्यंकय्या नायडू यांचा जाहीर निषेध, असे भाई जगताप यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

अधिक वाचा  पुण्यात नरेंद्र मोदी यांची २९ एप्रिल रोजी जाहीर सभा

राज्यसभेत नेमके काय घडले?
उदयनराजे भोसले यांनी राज्यसभा सदस्यत्त्वाची शपथ घेतल्यानंतर ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी’ अशी घोषणा दिली. यानंतर उदयनराजे भोसले कागदपत्रांवर स्वाक्षरी करत असताना सभापती व्यंकय्या नायडू यांनी म्हटले की, हा शपथविधी सोहळा राज्यसभेत होत नसून माझ्या दालनात होत आहे. हे रेकॉर्डवरही घेतलं जात नाही. सभागृहात कोणत्याही घोषणा देण्यास परवानगी नाही. नवीन सदस्यांनी भविष्यात हे लक्षात ठेवावे. हे सांगत असताना उदयनराजेंनी नायडू यांच्याकडे कटाक्ष टाकला. हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.