मुंबई : कोरोनामुळे मार्च महिन्यापासून देशातील क्षेत्र बंद आहे. या कोरोनाचा फटका हा देशातील शाळा महाविद्यालयांना देखील बसला आहे. कोरोनाची रुग्णसंख्या एकीकडे वाढत असताना दुसरीकडे बारावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली आहे. कारण बारावीचा निकाल आज जाहीर होणार आहे.

आज दुपारी 1 वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. बारावीच्या सर्वच शाखांची परीक्षा 18 फेब्रुवारी ते 18 मार्च यादरम्यान पार पडली. लॉकडाऊनच्या आधी बारावीची परीक्षा संपली होती. मागच्या वर्षी 28 मे रोजी बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला होता. मात्र यावर्षी लॉकडाऊनमुळे बारावीचा निकाल उशिरा जाहीर होत आहे.

अधिक वाचा  विजय शिवतारेंनी पुन्हा बैठक बोलावली, मोठी घोषणा करण्याची शक्यता?

 यावर्षी बारावीच्या परिक्षेसाठी एकूण 15 लाख 5 हजार 27 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. एकूण 9923 कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली होती आणि पूर्ण राज्यातील जवळपास 3036 परिक्षा केंद्रांवरुन ही बारावीची परिक्षा घेण्यात आली. यामध्ये सगळ्यात जास्त विद्यार्थी हे विज्ञान शाखेचे होते. विज्ञान शाखेचे 5 लाख 85 हजार 736, कला शाखेचे 4 लाख 75 हजार 134, तर वाणिज्य शाखेचे 3 लाख 86 हजार 784 विद्यार्थी आहेत. व्यावसायीक अभ्यासक्रामाचे 57 हजार 373 विद्यार्थी आहेत. आता या परीक्षेचा आज निकाल लागणार आहे, त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांची प्रतीक्षा संपली आहे.

अधिक वाचा  मराठा समाजाच्या बैठकीत जोरदार हाणामारी, कार्यकर्ते आपापसात भिडले

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी गुणपडताळणी उत्तरपत्रिकांची छायांकित प्रत मिळणे आणि पुनर्मूल्यांकनासाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत या गोष्टींसाठी विद्यार्थ्यांना शाळेत जाऊन अर्ज करावे लागत होते. पण आता या प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. निकाल जाहीर झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून ही प्रक्रिया सुरु केली जाईल.

बारावीचे विद्यार्थी http://verification.mh-hsc.ac.in या वेबसाईटवरुन अर्ज करु शकतील. या अर्जासाठी लागणारी फी सुद्धा आॅनलाईन भरावी लागेल. 16 जुलैला बारावीचा निकाल जाहीर झाल्यावर 17 जुलैपासून बारावीचे विद्यार्थी या वेबसाईटवरुन अर्ज दाखल करु शकणार आहेत.

अधिक वाचा  राष्ट्रवादीनं साताऱ्यावरील आग्रह सोडला? “सातारा सोडतो पण त्या बदल्यात…”