मुंबई: गणेशोत्सवात चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी नियोजन करण्यासाठी आज मंत्रालयात बोलावण्यात आलेल्या बैठकीतून भाजपचे खासदार नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांना डावलण्यात आले. त्यामुळे नितेश राणे प्रचंड संतापले आहेत. ही लोकप्रतिनिधींची बैठक होती की शिवसेनेची असा सवाल करतानाच सरकारच्या या नियोजन शून्यतेमुळेच कोकणचं नुकसान झालं आहे, असा आरोप नितेश राणे यांनी केला आहे. तर ही लोकप्रतिनिधीची बैठक नव्हती. प्रशासनासोबत मंत्र्यांची चर्चा होती, असं सांगत परिवहन मंत्री अनिल परब यांनी राणेंवर पलटवार केला आहे.

राज्याचे परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी आज मंत्रालयातील नव्या प्रशासकीय इमारतीत कोकणातील लोकप्रतिनिधींची बैठक बोलावली होती. या बैठकीला शिवसेना आणि राष्ट्रवादीचे आमदार-खासदार उपस्थित होते. मात्र नारायण राणे आणि नितेश राणे यांना या बैठकीचं निमंत्रण देण्यात आलं नव्हतं. त्यामुळे नितेश राणे यांनी संताप व्यक्त केला आहे. कोकणातील गणेशोत्सवा संदर्भात आज मंत्रालयात अत्यंत महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला सर्वपक्षीय आमदारांना बोलावण्यात का आलं नाही? असा सवाल नितेश राणे यांनी केला. आम्ही दोन वेळा निवडून आलो आहोत.

अधिक वाचा  रशिया, चीनप्रमाणे मोदींची गॅरंटी म्हणजे व्‍यक्‍तिस्‍तोमच; केवळ ३०% मते भाजपकडे अनपेक्षित निकाल: चव्हाण

लोकांमध्ये फिरत असतो. जनतेच्या समस्या आम्हाला माहीत आहेत. आम्हाला बोलावलं असतं तर वेगळया प्रकारची मतं सरकारला कळली असती आणि गणेशोत्सवाच्या नियोजनासाठी त्याचा फायदाच झाला असता. पण या सरकारने त्यांचं ऐकणाऱ्या लोकप्रतिनिधीला बोलावून एकतर्फी चर्चा घडवून आणली. त्यामुळे नियोजनाच्या बैठकीला काहीच अर्थ उरलेला नाही, अशी घणाघातील टीकाही त्यांनी केली.

दुसऱ्या कुणाचं ऐकायचं नाही, आपलं म्हणणंच रेटायचं ही या सरकारची वृत्ती आहे. त्यामुळेच कोकणाचं नुकसान होत आहे, असं सांगतानाच गणेशोत्सवाच्या श्रेयवादासाठी सरकार धडपडत असल्याचा आरोपही राणे यांनी केला.

नितेश राणे यांनी ट्विट करूनही आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली आहे. आज झालेल्या या बैठकीला शिवसेना खासदार विनायक राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील तटकरे, शिवसेना आमदार योगेश कदम, रमेश लटके, भरत गोगावले, महापौर किशोरी पेडणेकर आदी उपस्थित होते. तसेच काही आमदार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.

अधिक वाचा  महायुतीत ८ जागांवर तिढा, भाजप नेतृत्वाला डोकेदुखी; पूनम महाजनांची उमेदवारीही येथे रखडली?

परब यांचं प्रत्युत्तर
अनिल परब यांनीही राणेंच्या आरोपाचा समाचार घेतला आहे. ही बैठक फक्त शिवसेनेची नव्हती, तर तिथे राष्ट्रवादीचे नेतेही उपस्थित होते. प्रशासनासोबत मंत्र्यांची चर्चा होती. या बैठकीसाठी आम्ही कोणाला निमंत्रण पाठवले नव्हते, असा पलटवार परब यांनी केला आहे.

कोकणातील करोना परिस्थितीचा या बैठकीत आढावा घेण्यात आला. तसेच चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी उद्भवणाऱ्या समस्यांवरही या बैठकीत चर्चा करण्यात आली असून बैठकीचा तपशील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देऊन त्यावर निर्णय घेण्यात येणार असल्याचं परब यांनी सांगितलं.