कर्नाटक, मध्य प्रदेशपाठोपाठ आता राजस्थानमध्येही काँग्रेस सरकार कोसळणार अशी शक्यता निर्माण झाली होती. पण आता काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी पुकारले बंड अखेर थंड झाल्याची चिन्ह आहे. सचिन पायलट यांनी भाजप प्रवेशाची शक्यता फेटाळून लावली आहे. तर काँग्रेसनेही 109 आमदाराचा पाठिंबा असल्याचं जाहीर केले आहे. राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील वादावर काँग्रेसच्या कार्यकरिणीची बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी दोन्ही नेत्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला.

राहुल गांधी यांनी रणदीप सुरजेवाला यांच्या फोनवरुन अशोक गहलोत यांच्याशी चर्चा केली. तसंच दुसरीकडे सचिन पायलट हे सकाळपासून राहुल गांधी यांच्या संपर्कात होते. सचिन पायलट यांनी कोणताही मोठा निर्णय घेऊ नये, त्यांनी परत यावे, त्यांना सन्मानाने पक्षात स्थान दिले जाईल, असा निरोप देण्यात आला आहे. तर प्रियांका गांधी यांनीही मध्यस्थी करून दोन्ही नेत्यांशी संवाद साधला.

अधिक वाचा  लोकशाहीच्या युद्धात घराघरांत रणधुमाळी; भाऊ-बहिण, नणंद-भावजयीत जुंपली

दरम्यान, अजय माकन यांनी, ‘काँग्रेसकडे 109 आमदारांचा पाठिंबा आहे. आम्ही हा अहवाल सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना पाठविला आहे. गहलोत सरकार स्थिर आहे, बहुमत सिद्ध करेल आणि गहलोत यांच्या नेतृत्वावर केंद्रीय नेतृत्त्वाचा विश्वास आहे’, असं स्पष्ट केले. तसंच, बंडखोर नेत्यांशीही सहानुभूतीपूर्वक वागले पाहिजे असे निर्देश राहुल गांधींनी दिले आहे, अशी माहितीही माकन यांनी दिली.

तर दुसरीकडे राजस्थानमध्ये अशोक गहलोत यांच्या निवास्थानी बोलावल्या बैठकीला 100 पेक्षा जास्त आमदार उपस्थितीत होते. त्यामुळे दोन दिवसांपासून पेटल्या वादावर यामुळे पडदा पडला. परंतु, या बैठकीला सचिन पायलट यांचे समर्थक गैरहजर होते. सचिन पायलट यांनीही भाजपमध्ये जाण्यास नकार दिल्यानंतर त्यांच्या मनधरणीचे काँग्रेसकडून प्रयत्न सुरू आहे. आता सचिन पायलट परत काँग्रेसमध्ये येता की वेगळा निर्णय घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.