नवी दिल्ली: राजस्थानात काँग्रेसच्या गेहलोत सरकारला संकटाने घेरले असून मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यामधील मतभेद आता चव्हाट्यावर आले आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी सक्रिय झाल्या आहेत. राजस्थानातील समस्या सोडवण्याच्या उद्देशाने सोनिया गांधी यांनी तीन नेत्यांना जयपूरला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
जयपूरला जाणाऱ्या या नेत्यांमध्ये अजय माकन, रणदीप सुरजेवाला आणि अविनाश पांडे यांचा समावेश आहे. हे तीन नेते काँग्रेसच्या आमदारांशी चर्चा करतील. अजय माकन, रणदीप सुरजेवाला आणि अविनाश पांडे आज रविवारी रात्रीच जयपूरला रवाना होत आहेत.
तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाने सचिन पायलट यांनाही निर्देश देण्यात आले आहेत. सचिन पायलट हे आज रात्री जयपूरला पोहोचण्याची शक्यता आहे. पायलट काँग्रेसच्या या तीन नेत्यांसोबत बैठक करतील आणि उद्या ते आमदारांच्या बैठकीत देखील भाग घेण्याची शक्यता आहे.
ज्योतिरादित्य शिंगेही मैदानात
दरम्यान, कॉंग्रेसच्या या लढाईत भाजपाला फायदा होताना दिसत आहे. सचिन पायलट यांना आपल्या पक्षात घेण्याचा प्रयत्न भाजप करीत आहे. यासाठी भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदे मैदानात उतरले आहेत. सचिन पायलट यांना बाजूला सारल्यामुळे मी दु: खी आहे, असे त्यांनी ट्विट ज्योतिरादित्य शिंदे यांनी केले आहे. या परिस्थितीवरून कॉंग्रेसमध्ये कर्तृत्व आणि क्षमता काही महत्त्वाची नाही असे दिसत असल्याची टीकाही शिंदे यांनी केलीय.
उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना आमदारांना पैशाचे आमिष दाखवून फोडण्याबाबतच्या प्रकरणी एटीएस आणि एसओजीच्या वतीने चौकशीसाठी नोटीस पाठवण्यात आल्यानंतर राजस्थानात राजकीय संकट वाढले. सचिन पायलट आपल्या सरकारच्या या कारवाईमुळे अतिशय नाराज झाले.
शनिवारी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी आपल्या आमदारांना आमिष दाखवून सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. यासंदर्भात मुख्यमंत्री गहलोत यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसओजीची स्थापना केली. एसओजी मुख्यमंत्र्यांच्याच अधिकारक्षेत्रात आहे. त्यामुळे ही नोटीस म्हणजे दोघांमधील संघर्षाचा परिणाम असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणात सीएम गेहलोत यांची चौकशी केली जाऊ शकत असली तरी देखील याला फारसे महत्व नसल्याचे बोलले जात आहे.
सचिन पायलट यांना नोटीस
ही चौकशी भाजपच्या दोन नेत्यांच्या फोन कॉल्सच्या आधारे केली जात आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की राज्य सरकार पाडण्यासाठी चर्चा केली जात आहे. १० जुलै रोजी ही नोटीस मिळाल्यानंतर सचिन पायलट खूप अस्वस्थ असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.