नवी दिल्ली: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारने रेल्वेच्या खासगीकरणाच्या दिशेने उचललेल्या पहिल्या पावलावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. सरकारने असे केल्यास देशातील जनता सरकारला माफ करणार नाही, असे राहुल गांधी म्हणाले. रेल्वे मंत्रालयाने आज देशातील एकूण १०९ जोडी मार्गांवर खासगी रेल्वेसेवा सुरू करण्यासाठी प्रस्ताव मागवले आहेत. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ही माहिती दिली आहे. देशभरात असलेले रेल्वेचे जाळे एकूण १२ क्लस्टरमध्ये विभागले गेले आहे. याच क्लस्टरमध्ये या १०९ जोडी मार्गावर खासगी रेल्वे चालवण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे.
जगातील सर्वात मोठे असलेले भारतातील रेल्वे नेटवर्कद्वारे सुमारे १३ हजार ट्रेन चालतात. भारतीय रेल्वे जवळजवळ १२ लाख लोकांना रोजगार देते. प्रवासी सेवेचा एक मोठा भाग सवलतींवर चालतो. यामुळे काही वर्षांपासून रेल्वेला मोठे नुकसान सोसावे लागत आहे. हे नुकसान भरून काढणे रेल्वे मंत्रालयाला शक्यही झालेले नाही.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विंट करत केंद्र सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला आहे. ते आपल्या ट्विटमध्ये लिहितात, ‘रेल्वे ही गरिबांची एकमेव जीवनरेषा आहे आणि सरकार त्यांच्यापासून ती हिरावून घेत आहे. जे हिरावून घ्यायचे आहे ते घ्या, मात्र हे लक्षात ठेवा- देशाची जनता याचे ठोस उत्तर देईल.’
केंद्र सरकारने या प्रस्तावाच्या माध्यमातून खासगीकरणाकडे टाकलेले पहिले पाऊल असल्याचे म्हटले जात आहे. या प्रस्तावासाठी खासगी क्षेत्राकडून ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. केंद्र सरकार हे पाऊल उचलून आधुनिक तंत्रज्ञानाला चालना देणे आणि त्याद्वारे देखभालीचा येणारा मोठा खर्च कमी करणे हा उद्देश साध्य करत आहे. या मुळे ट्रान्झिट टाइमदेखील कमी होणार असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. या व्यतिरिक्त यामुळे देशातील बेरोजगारांसाठी नोकरीच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. तसेच या उपक्रमामुळे प्रवाशांना योग्य ती सुरक्षा पुरवून जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करणेही शक्य होणार आहे. प्रवासी गाड्या चालण्यासाठी खासगी गुंतवणुकीचा रेल्वेचा हा पहिलाच उपक्रम आहे.

अधिक वाचा  पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; सुप्रिया सुळेंची फेसबुक पोस्ट; भारती पवार यांचं निधन काकीच्या आठवणीने सुप्रिया सुळें गहिवरल्या