मुंबई : चीनच्या वुहानमधून पसरलेल्या कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होताना दिसत आहे. कोरोना व्हायरसचं प्रमाण उन्हाळ्यात कमी होईल हा अंदाज चुकीचा ठरला असून आता मोठ्या प्रमाणात रुग्णाची संख्या वाढताना दिसत आहे. भारतातील रिकव्हरी रेट चांगला असला तरीही कोरोनाची लागण दर दिवशी होणाऱ्यांची संख्या जास्त वेगानं वाढत आहे. जून महिन्यात भारतात जवळपास दर दिवशी 15 हजार किंवा त्याहून अधिक रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचं पाहायला मिळालं.
जूनमध्ये झालेल्या कोरोनाचा विस्फोटाची स्थिती ही जुलै महिन्यात आणखीन संवेदनशील होऊ शकते असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. जून महिन्यात 3.48 लाखहून अधिक कोरोनाची लागण झालेले नवीन रुग्ण आढळले. डेटा तज्ज्ञाच्या मते कोरोनाची लागण आणि मृत्यू होण्याचं प्रमाण हे जूनमध्ये सर्वाधिक होतं.
आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार 31 मेपर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या 1,82,143 होती. तर बुधवारी 1 जुलैरोजी ही संख्या 5, 85,493 वर पोहोचली आहे. मृत्यूदर पाहिला तर कोरोनामुळे मे महिन्याच्या तुलनेत जून महिन्यात जास्त मृत्यू झाले आहेत. केरळचे ज्येष्ठ डेटा तज्ज्ञ जेम्स विल्सन यांच्या म्हणण्यानुसार जुलै महिन्यात 5 ते 6 लाख नवीन रुग्ण आढळतील असा अंदाज आहे. जूनच्या तुलनेत जुलैमध्ये मृत्यूची नोंदही अधिक असू शकते असं म्हटलं आहे.
जुलै आणि ऑगस्ट महिना कोरोनाचा पीक टाइम असेल असा दावाही काही तज्ज्ञांनी केला आहे. त्यामुळे नागरिकांना जास्त काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. आधीच पावसाळ्यात विविध साथीचे रोग आणि त्यामध्ये असलेल्या कोरोनामुळे मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. हे दोन महिने नागरिकांना अधिक सतर्क राहाणं आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं अधिक महत्त्वाचं ठरणार आहे.

अधिक वाचा  गैरविश्वास दाखवला तर ‘हे’ लक्षात ठेवा, पक्षप्रवेशाच्याच दिवशी मोहिते पाटलांचा आढळरावांना मोठा इशारा